सदाभाऊ म्हणतात कोरोना गेल्यावर बसू, राजू शेट्टी म्हणतात बसण्याचे अर्थ अनेक!

| Updated on: Feb 02, 2021 | 4:48 PM

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज बारामती न्यायालयात हजेरी लावली.

सदाभाऊ म्हणतात कोरोना गेल्यावर बसू, राजू शेट्टी म्हणतात बसण्याचे अर्थ अनेक!
Follow us on

बारामती : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज बारामती न्यायालयात हजेरी लावली. 2012 साली बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनप्रकरणात या दोन्ही नेत्यांसह 50 जणांवर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी न्यायालयात साक्ष देण्यासाठी एकेकाळचे सच्चे मित्र पण आता एकमेकांसमोर उभे राहिलेले हे दोन्ही नेते बारामतीत होते. त्यावेळी दोन्ही नेते आपली साक्ष झाल्यानंतर एकमेकांसमोर आले पण एकमेकांकडे न पाहताच त्यांनी काढता पाय घेतला. पण माध्यमाशी बोलनताना एकमेकांची भेट घेण्याबाबत त्यांनी केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.(Sadabhau Khot and Raju Shetty at Baramati Court)

सदाभाऊ खोत यांना राजू शेट्टी यांची भेट घेण्याबाबत विचारलं असता, “राजू शेट्टी कामानिमित्त बाहेर आहेत. त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. आपण सर्वांच्याच हातात हात देत असतो. पण कोरोनामुळे बंधने आली आहेत. एकमेकांना मिठी मारणं बंद झालं आहे. एकदा का कोरोना गेला की या विषयावर आपण बसू”, असं उत्तर सदाभाऊंनी दिलं. तर राजू शेट्टी यांनाही हाच प्रश्न विचारल्यावर “आपण असंगाशी संग करत नाही. बसण्याचे अनेक अर्थ होतात,” असं मिश्किल उत्तर शेट्टी यांनी दिलं आहे.

जाणते नेते शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचं प्रेम दाखवतात- खोत

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. त्यावेळच्या सरकारनं शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार केला. आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. जे आज शेतकऱ्यांच्या नावानं गळा काढत आहेत. त्यांनी आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वागणूक दिली ही तपासण्याची वेळ आली आहे. आज मात्र शेतकऱ्यांचे तारणहार आम्हीच आहोत असा अविर्भाव दाखवला जात आहे. जाणते नेते शेतकऱ्यांबाबत पुतन मावशीचं प्रेम दाखवत आहेत”, अशा शब्दात खोत यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधलाय.

‘दिल्लीच्या तख्तासाठी आंदोलन सुरु’

काही वर्षांपूर्वी शरद जोशी आणि राकेश टिकैत यांनी परमिट राज बंद व्हावं यासाठी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं होतं. मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हे आंदोलन मोडीत काढलं. आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते शेतकऱ्यांना मिळणारं स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं हे आंदोलन राहिलं नसून दिल्लीच्या तख्तावर कुणी बसावं, हा दृष्टीकोन ठेवूनच हे आंदोलन होत असल्याची टीका खोत यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर, राजू शेट्टींच्या ‘टायमिंग’ने भेट टळली!

राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांना दिलासा, कराड सत्र न्यायालयाकडून ऊसदरातील आंदोलन खटल्यातून निर्दोष मुक्तता

Sadabhau Khot and Raju Shetty at Baramati Court