AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain : राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, काय आहे कारण?

Weather update and Rain : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. तसेच आगामी तीन, चार दिवस पाऊस कायम राहणार आहे. पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ होत आहे.

Rain : राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार, काय आहे कारण?
कोकणात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय.Image Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 25, 2023 | 7:47 AM
Share

अभिजित पोते, पुणे | 25 जुलै 2023 : राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर सोमवारी कायम होता. मंगळवारी सकाळपासून पुन्हा अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुणे, रत्नागिरी, ठाणे सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात यलो अलर्ट दिला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यास यलो अलर्ट दिला आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

का वाढणार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिमेकडे सरकणार आहे. त्यामुळे पश्चिम किनारी कोकण, विदर्भातील काही भाग, मराठवाडा आणि तेलंगणासह ओरिसाच्या काही भागात २५ ते २८ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट

पुण्यासह ठाणे जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यात ठाणे, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये देखील पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

कोकणात नागरिकांचे स्थलांतर

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नातूवाडीत दरड कोसळण्याची भीती आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले होते. त्यानंतर रातोरात प्रशासकीय यंत्रणा हलली. खेड तालुक्यातील नातूवाडीतील लोकांचे स्थलांतर करण्यात आले. नातूवाडीतील ११ लोकांचे प्रशासनानं स्थलांतर केले आहे. नातूनगरच्या जिल्हा परिषद शाळेत लोकांचे स्थलांतर केले आहे.

चंद्रपुरात पुन्हा पाऊस

3 दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपुरात मंगळवारी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. वर्धा, इरई आणि झरपट नद्यांमुळे चंद्रपूर शहरात आलेला पूर ओसरला आहे. परंतु पाऊस सुरु झाल्याने पुन्हा एकदा काळजीचे ढग दाटले आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या सात तासांपासून स्थिर आहे. नदीची पाणी पातळी 40 फूट 4 इंचावर स्थिर आहे. राधानगरी धरण 94 टक्के भरले आहे. यामुळे मंगळवारी रात्रीपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

Follow Us