Pune rain : मुसळधार सुरूच, पुण्यासह राज्यात रेड अलर्ट; पुढचे तीन-चार दिवस बरसतच राहणार, पुणे वेधशाळेचा अंदाज

| Updated on: Aug 09, 2022 | 9:49 AM

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणचा संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यात काल एका दिवसात सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

Pune rain : मुसळधार सुरूच, पुण्यासह राज्यात रेड अलर्ट; पुढचे तीन-चार दिवस बरसतच राहणार, पुणे वेधशाळेचा अंदाज
पुणे जिल्ह्यातील मुसळधार पाऊस
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे शहरात पावसाचा जोर कायम (Pune rain) राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पाऊस सुरू आहे. 12 ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार, असे आधीच वेधशाळेने स्पष्ट केले होते. त्यानुसार हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सध्या सुरू आहे. तर जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचेही वेधशाळेने म्हटले होते. त्यामुळे रेट अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. शहरात मंगळवारच्या सकाळच्या अपडेट्सनुसार, 36.8 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सध्या मान्सून सक्रिय झाला असून केवळ पुण्यातच नाही, तर राज्यातील विविध जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावत आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या किनारपट्टीदरम्यान द्रोणीय स्थिती असून त्यामुळे राज्यभर पाऊस बरसत आहे. पुण्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) घोषित करण्यात आला आहे.

खडकवासलाच्या पाणीसाठ्यात वाढ

पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. चारही धरणात एकूण 21.54 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत 73.90 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर धरण क्षेत्रात काल सर्वात जास्त 25 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सध्या खडकवासला धरणात 40.35 टक्के म्हणजे 0.80 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण 83.50 टक्के भरले आहे. या धरणात 8.89 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

मुसळधार पाऊस आणि दुर्घटना

जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणचा संपर्क तुटला आहे. अमरावती जिल्ह्यात काल एका दिवसात सहा जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर घातल्याने तीन मजूर तर वरूड तालुक्यात दोन जण आणि तिवसाच्या शिवनगावात एक वृद्ध पुरात वाहून गेला आहे. या सहा जणांचा शोध सुरू आहे. तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे नारायण टाव्हरे या शेतकऱ्याची राहत्या घराची भिंत कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. यासह विविध दुर्घटना आणि नुकसान या मुसळधार पावसामुळे सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

जोर कायम राहणार

राज्यात 12 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील काही तासांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्याचा भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा असणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, अशा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.