महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीच्या कामाला सुरुवात, आदिवासी बांधवांची लगबग

| Updated on: Jul 25, 2021 | 3:11 PM

महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली असताना अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मात्र अशातच बहुतांश ठिकाणी भात लावणीची काम सुरु झाली आहेत.

महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीच्या कामाला सुरुवात, आदिवासी बांधवांची लगबग
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली असताना अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मात्र अशातच बहुतांश ठिकाणी भात लावणीची काम सुरु झाली आहेत. फक्त कोकणातच नाही तर सर्वत्र भात लावणीची लगबग सुरु झाली आहे. पुण्यातील जुन्नर आंबेगावमधील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांनीही भात लागवडीच्या कामाला सुरुवात केली आहे. (Maharashtra Tribal Community of western part has started rice cultivation after heavy rain)

भात लावणीस सुरुवात

पुण्यातील जुन्नर आंबेगावमध्ये आदिवासी बांधवांनी भात लावणीच्या कामाला यंदा जोमात सुरुवात केली. सुरुवातीला पावसाळा कमी असल्यामुळे भाताची रोपे ही विहिरीच्या पाण्यावर तयार करावी लागली. त्यामुळे भात रोपे लागवडीला उशीर झाला. पण तरीही ही रोपे बहरायला सुरुवात झाली आहे. लागवड करण्यासाठी वेळीच पाऊस न आल्यामुळे भात लागवडीसाठी आदिवासी बांधवांना थांबावे लागले. पण गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीमध्ये पाणी साचले. त्यामुळे भात लावणीसाठी सुरुवात झाली.

आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण

भात लावणीमुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता नेहमीप्रमाणे आदिवासी बांधव भात लावणी करताना, गाणी गाताना पाहायला मिळत आहे. संपूर्ण पश्चिम पट्ट्यातील भात शेतीवर आदिवासी कुटुंबातील लोक वर्षभर जिवंत राहतात. त्यामुळे आता भात लागवडीला सुरुवात झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.

(Maharashtra Tribal Community of western part has started rice cultivation after heavy rain)

संबंधित बातम्या : 

मुंबई कोकणात धुवाँधार मात्र मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा, धरणक्षेत्रात पाऊसच नाही!

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली, पावसानं पिकं पिवळी पडली, कापूस, सोयाबीनला धोका

कृष्णाकाठाला दिलासा, काही ठिकाणी कृष्णा नदीची पातळी स्थिर, सांगली शहरात मात्र पाणीच पाणी!