पुण्यात मोठी दुर्घटना, बचावासाठी थेट आर्मी पोहोचली, आक्रोश आणि मातम, इमारत कोसळल्याने खळबळ; अनेकजण अडकले
Moshi Building Collapse : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच आर्मीसह अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

पुण्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले होते, यातील 5 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू असून, परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
आर्मीकडून बचावकार्याला सुरुवात
समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेतील लोकांच्या बचावासाठी आता आर्मीला पाचारण करण्यात आले आहे. आर्मीचे पथक आता कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवत आहे. इमारतीच्या मागील बाजूस कचरा डेपो असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा इमारतीच्या ढिगाऱ्यावर पसरला असून, जेसीबीच्या साहाय्याने कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
15 जण अडकले
या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी म्हटले की, मोशी या ठिकाणी कचरा डेपो भागात इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक होते त्यामधील पाच लोक वाचवले आहेत आणखी 15 लोक अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांसोबत एनडीआरएफ जवानांचा संपर्क होत आहे. त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अडकलेल्या लोकांशी संपर्क होत आहे…
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी सांगितले की, मोशीमध्ये कचरा डेपोची इमारत कोसळली आहे. यामध्ये जवळपास वीस लोक अडकले होते, त्यापैकी पाच जण सुरक्षित बाहेर आले आहेत मात्र अद्यापही 15 लोक आत मध्ये आहेत अडकलेल्या लोकांसोबत आमचा संपर्क होत आहे. लवकरात लवकर त्यांना बाहेर काढणे आमचे प्रयत्न आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसराला वेढा घातला आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे.