तमाशा क्षेत्राला सुगीचे दिवस, एका दिवसात कोटींची उलाढाल, अनेक तमाशा फड हाऊसफुल

| Updated on: Mar 23, 2023 | 10:39 AM

बदलत्या काळानुसार चित्रपट व ओटीटी प्लॅटफॉम आले. तसेच तमाशा क्षेत्रातही अनेक बदल होत आहे. परंतु तमाशाची लोकप्रियता अजूनही कायम आहे. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक मोठे करार झाले आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे.

तमाशा क्षेत्राला सुगीचे दिवस, एका दिवसात कोटींची उलाढाल, अनेक तमाशा फड हाऊसफुल
Follow us on

सुनिल थिगळे, नारायणगाव, पुणे : १७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. आज चित्रपट आणि अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. त्यानंतर तमाशा या लोकप्रकाराची लोकप्रियता कायम असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. यामुळे एका दिवसांत तब्बल दहा कोटींचे करार झाले आहे. फक्त हेच नाही तमाशाचे मोठे फड बुक झाले आहे. यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. राज्यातील विविध भागातील यात्रा समितीचे पदाधिकारी आणि फडमालक यांच्यात बैठका गुढी पाडव्याला रंगल्या. त्यात मोठे करार झाले. कराराची ही किंमत दहा कोटींहून जास्त आहे.

का आहे तमाशांचे महत्व


ग्रामीण भागात यात्रा उत्सव तमाशांचा फडाशिवाय पूर्ण होत नाही. आता यात्रा व जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने गावोगावचे ग्रामस्थ तमाशा ठरविण्यासाठी नारायणगावच्या तमाशा पंढरीत दाखल बुधवारी आले होते. नारायणगाव तमाशा पंढरीत ३५ राहुट्या तमाशा मालकांनी लावल्या होत्या. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे जिल्ह्यातून बारामती, इंदापूर, दौंड; अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा; नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी, सिन्नर, निफाड यासह राज्यभरातून नागरिक आले होते.

हे सुद्धा वाचा

ऑनलाईन सुद्धा होतात करार


बदलत्या काळानुसार तमाशा क्षेत्रातही बदल होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अथवा त्यानंतर तमाशा करार होतात. आता व्हॉट्‌सपच्या माध्यमातून तमाशाचे करार केले जात असून, ऑनलाइन ऍडव्हान्स रक्कम पाठवली जात आहे. तमाशाचे करार करत करताना तमाशाच्या व्यवस्थापकांबरोबर चर्चा करून तमाशाची रक्कम व तारीख ठरविली जाते.

प्रसिद्ध फड झाले हाऊसफुल

रघुवीर खेडकर, विठाबाई नारायणगावकर, मालती इनामदार, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळेसह तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, आनंद लोकनाट्य आदी नामांकित फडमलकांचे पंचवीस ते तीस; तर हंगामी फडमालकांचे दहा ते वीस करार झाले आहेत. चैत्र पौर्णिमा (६ एप्रिल), कालाष्टमी (१३ एप्रिल), नवमी (१४ एप्रिल), अक्षय तृतीया (२२ एप्रिल), गुढी पाडवा (२२ मार्च), बुद्ध पौर्णिमा (५ मे) या प्रमुख तिथींचे करार पूर्ण झाले. अपेक्षित तमाशा कार्यक्रम न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.पाडव्याच्या मुहूर्तावर १०० हून अधिक तमाशा बुकिंगचे करार झाले आहेत. नारायणगाव येथील तमाशा पंढरीत दहा कोटींची उलाढाल झाली आहे.

का आली यावर्षी जास्त मागणी

तमाशा ग्रामीण भागातील लोकप्रिय प्रकार आहे. आता येत्या काही दिवसांत जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहे. तसेच बाजार समितीच्या निवडणुका आहेत. यामुळे यात्रांच्या माध्यमातून आपला प्रचार करण्याचे काम इच्छूक उमेदवार करणार आहेत. त्यामुळे यावर्षी जास्त मागणी आलीय.