Pune : खेळता खेळता सोहमचा पाय घसरला अन् कळलंच नाही… ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने घेतला चिमुकल्याचा जीव
Pune Rain Accident : पुण्यात खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे.

पुण्यासह राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पासवसामुळे अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटनाही समोर आले आहे. अशातच आता पुण्यात खड्ड्यात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे. आता या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्यातील इतरही घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुण्यात 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पुण्यातील लोणी काळभोर परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेले खड्डे सुरक्षाव्यवस्था न करता उघडे ठेवल्याने दोन वर्षीय सोहम लखन कसबे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. घरासमोर खेळत असताना सोहमचा पाय घसरून तो खड्ड्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी सुरक्षा उपाययोजना न करता काम अर्धवट सोडल्याचा आरोप होत असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
कल्याण-डोंबिवलीत तरुणाचा मृत्यू
कल्याण-डोंबिवली परिसरात 26 वर्षीय शशी राहुल चक्र या तरुणाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते आणि त्यात तुटलेली विजेची तार पडली होती. शशी या पाण्यात उतरताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वीज विभागाला तार तुटल्याची माहिती आधीच देण्यात आली होती, मात्र तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
मुंब्रा : करंट लागून युवतीचा मृत्यू
ठाण्यातील मुंब्रा परिसरात 17 वर्षीय आलिया हिचा पावसादरम्यान विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पाणी साचलेल्या भागात उघड्या तारांमधून वीजप्रवाह पाण्यात पसरला होता. रस्ता ओलांडताना आलियाला करंट लागला आणि तिचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पालघर : नदीच्या पाण्यात तरूण गेला वाहून
पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील 28 वर्षीय किशन वरठा मासेमारीसाठी नदीत उतरला होता. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला होता. याच दरम्यान तो नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह नदीत आढळून आला. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांपासून दूर राहण्याच्या वारंवार सूचना देऊनही ही दुर्दैवी घटना घडली असल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.