Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. कर्जमाफीची रक्कम खात्यात कधी जमा होणार याची प्रतिक्षा आज संपणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे. काय आहे अपडेट?

Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ ची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आज कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर तर होईलच पण शेतकर्यांच्या खात्यात पैसेही जमा होतील. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याविषयीची मोठी घोषणा केली आहे. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही याविषयीचे संकेत दिले होते.
दुपारी 3 वाजता पहिली यादी
आज दुपारी 3 वाजता शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली. अजित पवार यांची आज जयंती आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आजच कर्जमाफीची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. दुपारी 3 वाजता कर्जमाफीची यादी जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद होणार आहे. मंत्रालयात ही पत्रकार परिषद होणार आहे.
अखेर मुहूर्त लागला
यापूर्वी दोनदा कर्जमाफी दोनदा हुकली. 30 जूनपूर्वी कर्जमाफी होणार होती. नंतर 5 जुलै ही तारीख जाहीर करण्यात आली होती. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. गरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, असे सरकारने स्पष्ट केले होते. परिणामी कर्जमाफीला विलंब झाला होता. पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि कर्जमाफीसाठी तरतूद करण्यात आली. कर्जमाफीच्या निकषांमध्ये थोडाबहुत बदल झाल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले होते.
तर दोन दिवसांपूर्वी भरणे आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची यादी 22 जुलै रोजी जाहीर करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. तर आता सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज दुपारी 3 वाजता कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. ऐन पेरणी हंगामात शेतकऱ्यांचे कर्जखाते निरंक, नील होणार आहे. त्यांना आता नवीन पीक कर्ज घेण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना काही कागदपत्रे दाखवून या कर्जमाफीचा लाभ मिळेल. कर्जमाफी प्राप्त शेतकऱ्यांची यादी ही बँका, ग्रामपंचायत या ठिकाणी चिकटवण्यात येणार आहे.