Bharat Bandh : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ वेळेत रिक्षा सेवा राहणार बंद

| Updated on: Dec 08, 2020 | 10:53 AM

अलका चौकातून सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. पण यासाठी परवानगी नाकारण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Bharat Bandh : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, या वेळेत रिक्षा सेवा राहणार बंद
Follow us on

पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्यात आला आहे. भारत बंदला प्रतिसाद देण्यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर उतरणार आहे. अलका चौकातून सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. पण यासाठी परवानगी नाकारण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रिक्षा वाहतूक बंद असणार आहे. (Rickshaw will be closed in Pune from 11 to 1 pm to support the bharat bandh)

सर्व नागरिकांनी बंदला उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन सर्व पक्षीय संघटनांकडून करण्यात आलं आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अलका चौकात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकांनी विशेष माहिती घेऊन प्रवास करावा असं सांगण्यात आलं आहे.

पुण्यातही कडकडीत बंद

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे. एरवी दररोज किमान 900 मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. हमालही सहभागी झाले असल्याने मार्केटमध्ये शांतता दिसत आहे.

भारत बंदमुळे मुंबईत दूध पुरवठ्यावर काही परिणाम होणार आहे का ? याचा आढावा घेण्यासाठी टिव्ही 9 ची टीम अनेक ठिकाणी पोहोचली. यामध्ये मुंबईसह सर्व उपनगरांमध्ये दूध पुरवठा सुरळीत आहे. आरे, महानंद, अमूलसारख्या दुधाचा पुरवठा आणि विक्री नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर मुंबईत बाहेरुन येणारे दुधाचे टँकरसुद्धा पोहोचत आहेत. त्यामुळे मुंबईत दुधाच्या पुरवठ्यावर विशेष काही फरक पडलेला दिसत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दादरमध्ये भाजी मार्केट आणि वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू आहे. फूल मार्केटही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर नवी मुंबईत मात्र एपीएमसी मार्केट बंद आहे. नागपूरमध्येही धान्य मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र, भाजी मार्केट सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर रस्त्यावर टॅक्सी, बसेस सुरू आहेत. पण बंदच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा सकाळपासूनच कडक बंदोबस्त मुंबईत पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईत पाचही बाजार समित्या बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले असून, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या असून नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकाऱ्यांसोबत माथाडी कामगारांचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. (Rickshaw will be closed in Pune from 11 to 1 pm to support the bharat bandh)

इतर बातम्या –

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

शरद पवार घेणार राजनाथ सिंग यांची भेट, कृषी कायद्याविरोधात तोडगा निघणार का?

(Rickshaw will be closed in Pune from 11 to 1 pm to support the bharat bandh)