समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर… : नाना पटोले

| Updated on: Jul 10, 2021 | 10:57 PM

नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याचा गंभीर आरोप केला.

समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर... : नाना पटोले
Follow us on

पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. तसेच मी स्वबळावर लढण्याबाबत बोललो तर त्रास होतो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कामाला लागण्याचं सांगतात तेव्हा ते ठीक आहे, असं मत व्यक्त केलं. यावेळी नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याचा गंभीर आरोप केला. ज्यांना समझोताच करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असेल तर काहीच बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते (Serious allegation of Nana Patole on NCP and Shivsena in Lonavla Pune).

“मी स्वबळाबाबत बोलत तर त्रास होतो आणि मुख्यमंत्री बोलले तर ते ठीक आहे”

नाना पटोले म्हणाले, “स्वबळाबाबत मी जे बोललो त्यात मी माघार घेणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाला लागावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना कामाला लागा असं सांगितलं. म्हणजे मी स्वबळावर लढण्याबाबत बोलत होतो तर त्रास होत होता आणि आता ते बोलले तर ते ठीक आहे, काही नाही.”

“पुण्याचे बारामतीकर पालकमंत्री काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत”

“पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत. ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काम करत नाहीत. आपण म्हणतो काँग्रेसच्या संपर्कमंत्र्यांनी लक्ष घालावं, पण आपल्या संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते तेच ठरवतात. कारण त्यासाठी त्यांचीच सही लागते. कुठल्याही समित्यांवर नावं पाठवायची असतील तर त्याला संपर्कमंत्र्यांची सही चालत नाही. त्यासाठी पालकमंत्र्यांचीच सही लागते. हा त्रासालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद बनवावी,”

“हक्काचं असताना दिलं जात नसेल, तर मी माझ्या कर्मानं इथला पालकमंत्री बनेल”

“या त्रासामुळे कार्यकर्त्यांनी मानसिकदृष्ट्या खचू नये. आपल्या हक्काचं असताना आपल्याला दिलं जात नाही, पण मी माझ्या कर्मानं इथला पालकमंत्री बनेल, अशी शपथ घेतली पाहिजे. आपल्या पक्षाचा माणूस या पालकमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे,” असं नाना पटोल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितलं.

“समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…”

नाना पटोले म्हणाले, “ज्या लोकांना समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काहीच बोलायचं नाही. त्या रागालाच आपण आपली ताकद बनवली पाहिजे.”

संबंधित व्हिडीओ पाहा :

Serious allegation of Nana Patole on NCP and Shivsena in Lonavla Pune