कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही, म्हणून महाराष्ट्रात 50 टक्के महिला आरक्षण : शरद पवार

| Updated on: Feb 13, 2021 | 8:06 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाचा लेखाजोखाच मांडला.

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही, म्हणून महाराष्ट्रात 50 टक्के महिला आरक्षण : शरद पवार
Sharad Pawar
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाचा लेखाजोखाच मांडला. अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी करण्यात आल्याचं शरद पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची आठवण पवारांनी करुन दिली. ते जेजुरीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्धाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं म्हटलं (Sharad Pawar comment on great work by Queen Ahilyadevi Holkar).

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय अहवाल छत्रपती शाहू महाराजांनी लावला. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकर कुटुंबात विवाह लावला. आज मात्र समाजात जातीय विषमता निर्माण झालीय. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.”

“एका ऐतिहासिक कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलोय. अहिल्यादेवींनी इतिहास घडवून स्त्री शक्तीचं महत्व समाजाला दाखवलं. त्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात. या प्रांगणात येणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल. हा परिसर व्यवस्थित करण्यासाठी माजी-आजी आमदारांनी प्रयत्न केले. अनेक कामे जेजुरीत होतायत. हा परिसर अनेक दृष्टीने चांगला होतोय या गोष्टीचा आनंद वाटतो,” असं शरद पवार यांनी नमूद केलं.

‘पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी त्यांना खडसावलं’

शरद पवार म्हणाले, “जामखेड तालुक्यातील चोंडीला अहिल्याबाई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे यांनी मुलींना शिकवण्याचं काम केलं. मल्हारराव होळकर एकदा चोंडीला थांबले. त्यांनी चुणचुणीत मुलगी बागडताना पाहिली. त्यांनी आपले चिरंजीव खंडेराव यांच्यासाठी तिची निवड केली आणि सून म्हणून आणलं. दुर्दैवाने खंडेराव यांना लढाईत मृत्यू आला. मल्हारराव होळकर यांनी सती जायची पद्धत असताना सती न जाण्याचा आग्रह धरला. अहिल्याबाई यांनी प्रांताची जबाबदारी घेतली. इंग्रजी राजवटीशी संघर्ष केला. पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढल्यानंतर त्यांनी त्यांना खडसावलं. महेश्वर, इंदौर ही शहरे त्यांनी उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला.”

“कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही, म्हणून महाराष्ट्रात 50 टक्के महिला आरक्षण”

“महाराष्ट्राची जबाबदारी असताना मी 50 टक्के महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेकांना ते आवडलं नाही. त्यावेळी एकच उत्तर दिलं. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर इंदिरा गांधींनी देशाला ओळख मिळवून दिली. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही. आपल्याला समाज उभा करायचाय. स्त्री आणि पुरुष एकत्र करुन अहिल्याबाईंचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.

‘जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई एक’

शरद पवार म्हणाले, “अहिल्याबाईंची ओळख त्या काळात केवळ देशात नव्हती, तर जगभरात होती. त्यांची तुलना रशियाची राणी, ब्रिटेनच्या राणीशी करण्यात आली. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. इंग्लिश लेखकाने त्यांचं हे मोठेपण अधोरेखित केलं. अहिल्याबाईंनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय दिला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं.”

“अहिल्याबाईंनी जेजुरीच्या खंडेरायच्या परिसराला विकसित करण्याचं काम केलं. त्यांनी हातातील सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. 20 वर्षांपूर्वी उमाजी नाईक पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं. आज अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं उदघाटन ही सन्मानाची बाब आहे,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

पवारांसमोर जानकर म्हणाले, मराठा-धनगर एकत्र आल्यास, दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो!

अशोक चव्हाणांसारखा नतद्रष्ट नेता खुर्चीवर असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही: मेटे

लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच, पवारांचा गंभीर आरोप

संबंधित व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar comment on great work by Queen Ahilyadevi Holkar