पुण्यात महाविकास आघाडीतील बिघाडी टळली, पण अखेर ठाकरे गटालाच माघार घ्यावी लागणार?

| Updated on: Feb 03, 2023 | 8:38 PM

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची देहबोलीच बरंच काही स्पष्ट करणारी होती.

पुण्यात महाविकास आघाडीतील बिघाडी टळली, पण अखेर ठाकरे गटालाच माघार घ्यावी लागणार?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ (Kasaba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) तीनही बड्या मित्र पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर तीनही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कोणी उमेदवारी लढवावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. कारण दोन्ही मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष आक्रमक होते. तर ठाकरे गट पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आग्रही होता. पण आता सुभाष देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ठाकरे गट या पोटनिवडणुकांसाठी बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देहबोलीच बरंच काही स्पष्ट करणारी होती. त्यांच्या देहबोलीवरुन या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जातोय. पण याबाबतची अधिकृत घोषणा उद्याच होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सुभाष देसाई यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

“महाविकास आघाडीत दोन गट किंवा मतभेद असं काही नाही. शिवसेनेचा निर्णय हा नेत्यांच्या पातळीवर आणि पक्षप्रमुखांच्या पातळीवर होत असतो. तसाच तो होईल. याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही”, असं सुभाष देसाई म्हणाले.

“आम्ही आज अत्यंत सखोल असा आढावा घेतलाय जो दोन्ही विधानसभामध्ये आधी काय झालं होतं? आता काय परिस्थिती आहे आणि उद्या काय असू शकते? याचा साधकबाधक विचार करुन आम्ही जवळपास निर्णयापर्यंत आलो आहोत. आता फक्त आमच्या घटक पक्षांना विश्वास घेण्याचं काम बाकी आहे”, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.

“शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष इथलेच आहेत. काँग्रेसही त्यांच्या हायकमांडला विचारत असते. हे काम आज संध्याकाळी, रात्री होऊन उद्या सकाळी याबाबतचा अंतिम निर्णय होईल”, असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.

पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आजही ठाम आहात का?

या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी सुभाष देसाई यांना महत्त्वाचा प्रश्न विचारला. तुम्ही पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आजही ठाम आहात का? असा प्रश्न सुभाष देसाई यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आमची आजही तयारी आहेच”, अशी प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गट पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आग्रही

ठाकरे गट हा पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आग्रही होता. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत स्पष्ट मत मांडलं होतं. आम्ही पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आग्रही आहोत. कसबा पेठच्या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ठरवावं, असं संजय राऊत म्हणाले होते. ठाकरे गटाकडून पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी प्रचंड आग्रहदेखील करण्यात आला. पण राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील ही जागा हवी आहे.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया काय?

“पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन्ही जागा रिक्त झाल्याने आम्ही तिन्ही पक्षांनी या जागांचा आढावा घेतला. याबाबत आमची मित्र पक्षांची सकारात्मक चर्चा झाली. आमचे मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर मित्रपक्षांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत. त्यानंतर आम्ही आमचा अंतिम निर्णय उद्या घोषित करु”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.