मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही; मंत्री विखे पाटलांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

मनोज जरांगेंना आंदोलनाची वेळ येणार नाही; मंत्री विखे पाटलांची मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा
| Updated on: Jul 31, 2026 | 11:15 AM

मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. जरांगेंनी 29 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. सरकारकडून वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. परंतु मनोज जरांगे यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी तयारी सुरू केल्यानंतर सरकारची धावाधाव सुरू झाली. त्यानंतर आज शुक्रवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची अपडेट दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ‘आम्ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू केली. आंदोलकांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना मदत केली. मृत्यूमुखी पडलेल्या 32 जणांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला. त्यांना महामंडळ, एमआयडीसीमध्ये नोकरी देण्याचा निर्णय झाला. बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू केल्या. सारथी संस्थेत यूपीएससी करण्याऱ्यांच्या जागा 400 वर केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटची अंमलबजवणीसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याधिकाऱ्यांकडून हेल्पलाइन जारी करण्यात आला आहे. त्यांना प्रत्येक सोमवारी अंमलबजावणीचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. आता जात प्रमाणपत्राची अडचण राहणार नाही, याच्या सूचना दिल्या आहेत’.

महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, ‘सरकारने वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीमुळे मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. महाविकास आघाडीच्या काळात काही निर्णय रद्द झाल्याने समाजाचे मोठे नुकसान झालं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा मोठे निर्णय घेतले. शिंदे समितीने मोठं काम केलं. 58 लाख नोंदी शोधण्याचं काम झालं असून अजूनही काम सुरूच आहे’.

‘शिंदे समितीला 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.निर्णयाची अंमलबजावणी करण्यात शासन कमी पडले नाही. काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका घेतली अशी भूमिका आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याने घेतली नाही. सरकार अतिशय सकारात्मक आहे. परंतु जरांगेंची भावना योग्य असली तरी त्यांना आंदोलनाची वेळ येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

अभिजीत दीपके यांच्यावर भाष्य करताना म्हटलं की, अभिजीत दीपकेंनी त्यांना कोणी धमकी दिली, त्याचं नाव सांगावे. संसदेत विद्यार्थ्यांसाठी कायदा देखील झाला. मात्र काँग्रेस केवळ आंदोलनाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची भूमिका योग्य असताना दीपकेंनी अशी वक्तव्य करणे चुकीचे आहे. संदिग्धता निर्माण करण्यात अर्थ काय? राजकीय पक्षाकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांचा जनाधार गेलाय, ते आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण करताना दिसत आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us