तरुणीने दिलेली चिठ्ठी राहुल गांधींनी घालती खिशात, ती मराठीत बोलली, राहुल ऐकत राहिले; पुण्यातल्या सभेत काय घडलं?
Rahul Gandhi : पुण्याच्या मांजरीत उपोषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांना आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी राहुल गांधी यांनी हे निवेदन घेतले आणि ते खिशात घातले.

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी पुण्याच्या मांजरीत उपोषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांना आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी राहुल गांधी यांनी हे निवेदन घेतले आणि ते खिशात घातले. यानंतर तिने राहुल गांधी यांनी आपल्या समस्या सांगितल्या. यावेळी तिने काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
आदिवासी विकास मंत्र्यांचे धक्कादायक उत्तर
उपोषण करणाऱ्या विद्यार्थीनीने म्हटले की, ‘मला सकाळपासून ताप आहे, मी आणि माझे सहकारी मांजरीमध्ये मागच्या 10 दिवसांपासून उपोषण करत आहोत. मी आमच्या मागण्या घेऊन आले आहे. आम्हाला चांगल शिक्षण हवं आहे. मी जी मागणी करत आहे ती संपूर्ण देशातील आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझ्यासोबत उपोषण करणाऱ्या एक मुलीची तब्ब्येत बिघडली आहे. आमचे प्रतिनिधी आमच्या मागण्या घेऊन मंत्रालयात गेले होते. त्यावेळी आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांनी असं काही सांगितलं की जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणाले की सॉरी, मी यावर काही करू शकत नाही. हे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे.’
पुढे बोलताना तिने म्हटले की, ‘तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथे बसले आहात आणि तुम्ही आमचा विकास करू शकत नसाल तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या भागात ज्या आश्रमशाळा असतात, तिथे सेंट्रल किचन पद्धत सुरू आहे, म्हणजे एका ठिकाणी जेवण बनवलं जाणार आणि ते 70-80 किमी लांब नेले जाणार. त्यामुळे ते जेवण खराब होऊन विषबाधा होते. अलिकडेच गडचिरोलीतील आश्रमशाळेत मुली झोपलेल्या असताना त्यांना साप चावला, त्यात 3 मुलींचा मृत्यू झाला. त्या मुलींच्या पालकांनी 1 कोटीची मदत करावी, मात्र त्यांना केवळ 4 लाख दिले.’
राहुल गांधींकडे मोठी मागणी
पुढे बोलताना तिने सांगितले की, ‘आमचे आदिवासी मुलींचे होस्टेल आहेत ते मुख्य शहरात नसून शहराच्या बाहेर आहेत. त्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी मोठा प्रवास करावा लागतो. मी आता जे निवेदन दिले आहे, त्याचा विचार करून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. तसेच आदिवासी विभागाने नियम आणला आहे की मुली फक्त 30 वर्षांपर्यंत हॉस्टेलमधून राहून शिक्षण घेऊ शकतात. मला वाटतं हे वय वाढून 35 करण्यात यावं. यावर राहुल गांधी यांनी मला तुम्ही उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी निमंत्रित का नाही करत? यावर तरूणीने म्हटले की तुम्ही तिथे आलात तर आम्हाला आवडेल.’
आमची प्रेग्नन्सी टेस्ट…
मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आदिवासी विभागाच्या पुण्यातील हॉस्टेलमध्ये गडचिरोली, नांदेड, अमरावती येथून विद्यार्थी येतात. ते दररोज घरी जाऊ शकत नाहीत. जर आम्ही दिवाळी किंवा इतर वेळी सुट्टीसाठी घरी गेलो आणि एक महिन्यांपेक्षा जास्त वेळ घरी राहिलो तर सांगितलं जात की फिटनेस प्रमाणपत्र आणा. यात आमची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. आम्ही याविरोधात आवाज उठवतो आणि विचारतो की हे काय आहे तेव्हा सांगतात की, एका महिन्यात तुम्हाला संसर्गजन्य आजार झाला असेल तर त्याचा त्रास होईल. त्यामुळे आदिवासी हॉस्टेलमध्ये 24 तास एक नर्स का नाही ठेवली जात नाही असाही प्रश्न तिने उपस्थित केला.
