महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?

Rain Update : आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आणि इतरही काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली होती. सातारा जिल्ह्यातीला काही भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.

महाराष्ट्रावर दुहेरी संकट... अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?
Rain alert in Maharashtra
Image Credit source: Google
| Updated on: Apr 23, 2026 | 9:44 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आणि इतरही काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली होती. सातारा जिल्ह्यातीला काही भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जावळी तालुक्यातील ओझरे गावात जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर रामनगर परिसरात मोठं वडाचं झाड शेडवर कोसळल्याने हॉटेल सह वाहनांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संगमेश्वर तालुक्याला अवकाळीचा तडाखा

रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्याच्या काही भागाला विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तुरळ इथं मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली होती. हवामान विभागाने वर्तवलेला अवकाळी पावसाचा अंदाज खरा ठरला आहे. कोकणासाठी आज हवामान विभागाने अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. आता पुढील दोन दिवसही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

चिपळूणमध्येही कोसळधार

रत्नागिरीतील चिपळूणमध्येही आज अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली होती. आज वातावरणात प्रचंड बदल जाणवत होता आणि उष्णतेत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अचानक अवघ्या दहा मिनिटांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा अचानक झालेला पाऊस आंबा बागायतदारांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या वादळी पावसाचा हापूस आंबा बागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कुडाळमध्येही पावसाच्या सरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारनंतर प्रचंड गडगडाटासह पावसाने हजेरी लावली होती. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून जिल्ह्यात प्रचंड उकाडा वाढला होता, त्यानंतर दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन संध्याकाळी कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली तर उकाड्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला.

 

Follow Us