राज ठाकरेंनी भूमिका मांडताच आता दिल्लीत सूत्र हालणार, सुप्रिया सुळेंचे मोठे संकेत; निवडणुकीत आता…

जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकींवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. यावरच आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही मत व्यक्त केले आहे.

राज ठाकरेंनी भूमिका मांडताच आता दिल्लीत सूत्र हालणार, सुप्रिया सुळेंचे मोठे संकेत; निवडणुकीत आता...
supriya sule and raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2026 | 4:41 PM

Supriya Sule : राज्यात विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काही जागांवर महाविकास आघाडीतील उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे. त्यामुळे त्या-त्या मतदारसंघावरील महायुतीच्या उमेदवारीची निवड बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाला, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. दुसरीकडे खासदार संजय राऊत आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीत जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार समोर आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या विचारांवर सहमती दाखवली आहे. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या बहिष्कारावर मत व्यक्त केले आहे. हा मुद्दा आता मी थेट इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित करणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे-संजय राऊत यांच्या भेटीत काय घडलं होतं

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत अनेक अराजकीय तसेच राजकीय विषयांवरही चर्चा झाली. या भेटीचा तपशील राऊत यांनी माध्यमांना सांगितला. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकींवर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांची हीच भूमिका राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचीदेखील याला मान्यात आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता निवडणुकीवरील बहिष्काराचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राऊत आणि राज ठाकरे यांच्या भेटीत निवडणुकीवरील बहिष्कारावर जी चर्चा झाली, त्याविषयी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. तुमचे याविषयी मत काय? असे विचारताच राज ठाकरेंनी दिलेली सूचना चांगली आहे. येत्या 8 जून रोजी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत आम्ही या बहिष्काराच्या भूमिकेबाबत चर्चा करू, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, आता राज ठाकरे यांनी मांडलेल्या सूचनेवर थेट दिल्लीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात विरोधक खरंच निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचं अस्त्र बाहेर काढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us