
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चर्चा तयारी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षा तयारीत व्यस्त आहेत. अशातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील एका प्रमुख घटक पक्षाने जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. यामुळे भाजपसमोरील अडचण वाढली आहे. हा पक्ष कोणता आहे? आता या पक्षाने काय घोषणा केली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी पालिका निवडणूकीबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपाने जागा दिल्या तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणुका लढवा’ असं आठवले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता जागावाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना रामदास आठवले यांनी, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे-शरद पवार आणि काँग्रेस पक्षाशी युती न करण्याच्या सक्त सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे भाजपसोबत युती झाली नाही तर आरपीआय आठवले गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रामदास आठवले यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवरही भाष्य केलं आहे. ‘दोन्ही ठाकरे बंधु जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही. उलट महायुतीला फायदाच होईल. दोन्ही ठाकरेंच्या सगळीकडे बातम्या येतील, मात्र महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेत त्यांना अजिबात यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.’
रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याबाबतही भाष्य केले आहे. ‘मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आले तर दलित समाजाला अत्यानंद होईल. यामुळे महाराष्ट्राच्या उलथापालथ होईल. पण आंबेडकर कधी ऐक्यासाठी उत्सुक नव्हते. आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे आम्ही दोघे एकत्र येणे अशक्य आहे’ असं आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.