जळगाव : राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी गोंधळ उडाल्याचं पाहून युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरच काढता पाय घेण्याची वेळ आली. पाच मिनिटात भाषण आटोपतं घेऊन रोहित पवारांना जळगावातील कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघावं लागलं. जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला. (Rohit Pawar leaves NCP Program in Jalgaon after mismanagement)
जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरुवात केली. मात्र अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना चुकवत कार्यालयाच्या मागच्या दरवाजाने कसेबसे बाहेर पडले.
ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभर युवा वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे गेली आहेत. यापुढे आपण सर्व जण एकत्र आलो, तर पुढील निवडणुकांमध्ये निश्चितच चित्र बदलेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती पुढे पाठवू नये. काही विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात माहिती पाठवू शकतात. देशाच्या सुरक्षेला बाजूला ठेऊन एखाद्या पत्रकाराला माहिती पुरवणे, तीपण तीन दिवस आधी देणे, चुकीचे आहे. तो फक्त भाजपच्या बाजूने बोलत असेल म्हणून अशी माहिती देणे योग्य नाही. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून आपल्या सर्वांची सुरक्षा धोक्यात येत असेल, तर आपण सर्वांनी त्याच्यावर कारवाईची केंद्राकडे मागणी करायला हवी. भाजपने स्वतः अर्णब गोस्वामींच्या अटकेची मागणी करायला हवी, अशा शब्दात रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामींवर हल्लाबोल चढवला. (Rohit Pawar leaves NCP Program in Jalgaon after mismanagement)