‘मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते…’, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

"मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला राहायला जातील", असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांची कर्जत-जामखेडमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते..., रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 12, 2024 | 6:28 PM

महाराष्ट्राचं राजकारणात गुवाहाटीची चर्चा सातत्याने होत असते. गुवाहाटीची चर्चा होण्यामागे कारणही तसं आहे. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जो भूकंप घडून आला त्याचं केंद्र थेट गुवाहाटी येथूनच होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व आमदार गुवाहाटी येथून परत महाराष्ट्रात आले होते. तेव्हा शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचं फोनवरील संभाषणाचं काय झाडं, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओक्केमध्ये आहे, हे वाक्य तुफान चर्चेत आलं होतं. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गुवाहाटीची चर्चा सातत्याने होत राहते. आतादेखील आमदार रोहित पवार यांनी गुवाहाटीचा उल्लेख करत महायुतीवर निशाणा साधला आहे.

“मी चुकून जरी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते गुवाहाटीला राहायला जातील”, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील जामखेड येथे प्रचारसभेचे आयोजन केलं होतं. या प्रचारसभेत रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असे बॅनर झळकले होते. त्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

“कार्यकर्त्यांच्या भावना असतात. त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र चुकून जरी मी गृहमंत्री झालो तर महायुती सरकार मधले 60 टक्के नेते गुहाटीला राहतील आणि जरी नाही झालो तरी जे कोणी गृहमंत्री होतील त्यांच्याकडे कागदपत्रांसहित पुरावे देऊन कारवाई करू आणि सामान्य जनतेचा पैसा सामान्य जनतेच्या विकास कामासाठी वापरू”, असं रोहित पवार म्हणाले.

‘…तर महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती म्हणून’

“2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असती”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “2004 मध्ये अजित पवार, जयंत पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारखे अनेक मोठे नेते पक्षामध्ये होते. भुजबळांना जर मुख्यमंत्री केलं असतं तर नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असती आणि महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण झाली असती”, असं शरद पवारांना म्हणायचं असावं, असं मत रोहित पवारांनी मांडलं.