जंतर-मंतरवर 24 तासांत मोठं काही तरी घडणार? तासातासाला गर्दी वाढतेय; रोहित पवारांचा आंदोलकांना महत्त्वाचा सल्ला

rohit pawar : रोहित पवार यांनी दिल्लीत आंदोलनस्थळी अभिजीत दीपके यांना भेटून सल्ला दिला. यावेळी आंदोलकांना अलर्ट राहण्याचाही सल्ला दिला.

जंतर-मंतरवर 24 तासांत मोठं काही तरी घडणार? तासातासाला गर्दी वाढतेय; रोहित पवारांचा आंदोलकांना महत्त्वाचा सल्ला
| Updated on: Jul 25, 2026 | 8:57 AM

नीट पेपरफुटीवरून देशभरातील तरुणांमध्ये सरकारविरोधात असंतोष पाहायला मिळत आहे. पेपरफुटीवरून कॉक्रोच जनता पक्ष देखील जंतर-मंतरवर ठाण मांडून आहे. त्यांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतरही ते केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या नेतृत्वातील आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक राजकीय नेतेही दीपकेंना भेटून पाठिंबा देताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही अभिजीत दीपके यांना भेटून पाठिंबा दिला. त्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलकांना सतर्क राहण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला.

आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्री दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर टीका करताना म्हटलं की, ‘आज या जंतर-मंतरमधील आंदोलनात फक्त तरुण युवक सामील झाले नाहीत, तर सर्व वयोगटातील नागरिक सामील झाले आहेत. मी आता आंदोलनात फिरून बघितलं आहे. मी जवळपास या आंदोलनात ५ किलोमीटर संपूर्ण परिसर फिरलो आहे. आता रात्रीचे १२ वाजले आहेत आणि अजून आंदोलकांची गर्दी वाढत आहे. या तरुणांची आता एकच मागणी आहे की, केंद्रीय भ्रष्ट शिक्षणमंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणीला आम्ही पाठिंबा देत आहोत. हे आंदोलन कोणत्या राजकीय व्यक्तीचं नाही, हे आंदोलन पुढच्या पिढीचं म्हणजे तरुणांचं आंदोलन आहे’.

वांगचुक यांना उपोषण सोडण्यास भाग पाडलं : रोहित पवार

‘सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. पण ते आंदोलनातील लोकांना सोबत घेऊन उपोषण सोडले पाहिजे होतं. आता सोनम वांगचुक यांनी सांगितलं की मला बळजबरीने हे उपोषण सोडण्यास भाग पाडलं, माझ्या घरातील लोकांना खूप त्रास दिला. मग अशी जर पद्धत सरकार वापरत असेल, तर सरकारवर भरवसा कसा ठेवायचा? हे सरकारकडून आंदोलन दडपण्यासाठी काम केलं जात आहे. या आंदोलनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात केस टाकली आहे. आंदोलन उठवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला रोहित पवार यांनी दिली.

‘मुंबईत २६ तारखेला आंदोलन होत आहे. त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पोलिसांकडून जशी वागणूक आंदोलकांना मिळत आहे, ती चुकीची आहे. मुलींच्या अंगावर हात टाकला जात आहे, हे चुकीच आहे. त्याविरोधात आम्ही बोलत राहणार आहे. हे आंदोलन कोणत्या व्यक्तीचं नाही, हे आंदोलन तरुण युवकांचं आहे. त्यामुळे आम्ही देखील अनेक आंदोलन केली आहेत, त्यानुसार अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us