Russia Ukraine Crisis : रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्धाचा भडका, अहमदनगरचे 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले! पालकांमध्ये भीतीचं वातावरण

| Updated on: Feb 24, 2022 | 7:46 PM

अहमदनगरचेच जवळपास 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डॉक्टर व्हिडिओकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विध्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भारत सरकारला मुलांना सुखरुप परत आणण्याचं आवाहन केलंय. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचं सावट स्पष्ट दिसून येत आहे.

Russia Ukraine Crisis : रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्धाचा भडका, अहमदनगरचे 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले! पालकांमध्ये भीतीचं वातावरण
युक्रेनमध्ये अडकलेले अहमदनगरचे विद्यार्थी
Follow us on

अहमदनगर : जगावर पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाचे (World War) ढग दाटून आले आहेत. रशिया (Russia) आणि यूक्रेनमधील (Ukraine) संघर्ष तीव्र झालाय. रशियाने यूक्रेनच्या किव शहरापर्यंत आपलं सैन्य घुसवलं आहे. तसंच रशियाकडून यूक्रेनवर मिसाईल हल्ले केले जात आहेत. अशावेळी भारतातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांची चिंता लागून राहिली आहे. कारण भारतातील अनेक विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी आहेत. एकट्या अहमदनगरचेच (Ahemadnagar) जवळपास 40 विद्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डॉक्टर व्हिडिओकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विध्यार्थी यूक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी भारत सरकारला मुलांना सुखरुप परत आणण्याचं आवाहन केलंय. यावेळी पालकांच्या चेहऱ्यावरील चिंतेचं सावट स्पष्ट दिसून येत आहे.

यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भावना

टीव्ही 9 मराठीशी बोलताना एक पालक म्हणाले की, ‘माझा मुलगा आहे तिकडे. तो सेकंड इयरला आहे. तो म्हणतोय की सध्या इथे परिस्थिती चांगली आहे, तुम्ही काही काळजी करु नका. पण आमची अपेक्षा इतकीच आहे की तो यूक्रेनमधून सुखरुप यावा, त्याला भारतात लवकरात लवकर आणण्यात यावं. तिथले लोक त्यांना मदत करत आहेत. सगळे एकत्र राहत असून काही काळजी करु नका, असं तिथले लोक आम्हाला सांगत आहेत’.

एक महिला पालक म्हणाल्या की, ‘माझा मुलगा एमबीबीएसच्या सेकंड इयरला झाप्रोझियामध्ये आहे. आज त्याची फ्लाईट होती पण किव एअरपोर्टवर सकाळी काही बॉम्ब ब्लासिंग झाली अशा त्याचा सकाळी फोन आला होता. त्यामुळे त्यांच्या फ्लाईट रद्द झाल्या आहेत. सर्व मुलांना म्हणजे त्यांची जी बॅच आहे त्यांना किव शहरात त्यांच्या विद्यापीठाने बसेसची व्यवस्था केली आहे. कारण आता यूक्रेनमध्ये सर्वकाही बंद झालं आहे. ते थोडेसे चिंतित आहेत पण त्यांच्या विद्यापीठात गेल्यामुळे ते सेफ राहतील. आताच माझ्या मुलाशी माझं बोलणं झालं, तो सध्या किव बस स्टॉपवर आहे आणि बसची वाट पाहत आहे’.

तर ‘माझा मुलगा यूक्रेनमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याच्याशी बोलणं होतं. तो म्हणतो की आम्ही ठीक आहोत. पण आम्हाला चिंता लागून राहिली आहे. मुलांनी भारतात परत यावं यासाठी सरकारनं तातडीने पावलं टाकावीत’, असं आवाहन एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी केलंय.

‘मुलं सुरक्षित आहेत, पण सरकारने त्यांची सुटका करावी’

दरम्यान, डॉक्टर महेंद्र झावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या माध्यमातून सध्या 80 ते 90 मुलं यूक्रेनच्या विविध राज्यात सध्या शिक्षण घेत आहेत. यूक्रेनमध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यापासून मी सर्वांशी संपर्कात आहे. मुलांच्या म्हणण्यानुसार ते सेफ आहेत. पण आताची परिस्थिती पाहता भारत सरकारने मुलांना तिथून लवकरात लवकर परत आणावं आणि त्यांची या परिस्थितीतून सुटका करावी, असं आवाहन त्यांनी केंद्र सरकारकडे केलं आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Russia Ukraine Crisis : पुतिन यांना रोखण्यासाठी मदत करा, यूक्रेनची पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद