बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद

Sadabhau Khot : रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो... महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
Sadabhau Khot Rayat
Image Credit source: Google
| Updated on: Aug 30, 2026 | 8:56 PM

मंत्रीपद न मिळाल्याची खदखद व्यक्त करत विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सत्तेतील राजकीय समीकरणांवर भाष्य केले आहे. रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करत इथेनॉल मिश्रित पेट्रोलचेही समर्थन केले. सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले

सदाभाऊ खोत यांनी, ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस तळागाळातून वर येतो आणि दीडशे आमदारांचा नेता होतो. आम्ही पण तुमचेच आहोत. पण वाड्यातले सरदार फडणवीसांच्या पायाला जाऊन मिठी मारतात. पडळकर साहेब, हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले. ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आलीय’, अशी खदखद खोत यांनी व्यक्त केली.

फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक

त्याचवेळी सदाभाऊ खोत यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ‘आपला विस्थापित व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि प्रस्थापित त्याच्यासमोर लोटांगण घालू लागले, हा खरा आमचा विजय आहे, असेही म्हटले. यावेळी खोत यांनी सरकारकडे काही नेत्यांच्या कथित कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. ‘मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. हे गडी आत घ्या, यांना तेल लावून चांगलं मालिश करा. त्यांनी बँका, सूतगिरण्या, साखर कारखाने कसे खाल्ले याचा रिपोर्ट करा. या सर्व प्रस्थापितांनी गावगाडा उध्वस्त केला, असे खोत म्हणाले.

बँकेच्या संचालकपदावरूनही त्यांनी टोला लगावला. ‘आमदाराला बँकेत संचालक व्हावं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की बँक ही अलीबाबाची गुहा आहे. त्या गुहेत गेलं की पोतं घेऊनच बाहेर पडायचं, हे त्यांना माहिती आहे.’ असे विधान खोत यांनी केलं.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन

सदाभाऊ खोत यांनी यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे समर्थन करत विरोधकांवरही निशाणा साधला. जर इथेनॉलमुळे गाड्या बंद पडल्या असत्या, तर मुंबईत निम्म्या गाड्या बंद पडल्या असत्या. भारताच्या तुलनेत परदेशात अधिक प्रमाणात इथेनॉल मिश्रण केले जात असल्याचा दावा करत खोत म्हणाले की, ‘परदेशात 30 टक्के इथेनॉल मिक्स करतात, आपण 20 टक्के करतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचणार आहे.’

Follow Us