
“वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही. मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे. वोटसाठी भाजप काहीही करु शकते. वंदे मातरम सारखे प्रश्न आणायचे. मुस्लिम धर्मियांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. भाजप हिंदू-मुस्लिम करत राहते” असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी केला. “मुस्लिम दुःखी राहिला पाहिजे अशी भाजपची इच्छा असते. भाजपचं सरकार आहे, त्यांच्यात अहंकार भरलेला आहे. गांधी, आंबेडकर यांना मानणाऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि यांना थांबवलं पाहिजे” असं अबू आझमी म्हणाले. ‘मी पत्र देणार नाही, ना विरोध करणार. ज्यांना जे करायचय ते त्यांनी करावं’ असं वंदे मातरमवर अबू आझमी म्हणाले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबू आझमी म्हणाले की, “मी कोणत्याही आघाडीत सहभागी होणार नाही. उत्तर भारतीयांना शिव्या देतात अशांसोबत आम्ही नाही. लाऊडस्पीकर उतरवा अशा लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही” “काँग्रेससोबत आम्ही आधी गेलो होतो, मात्र आम्हाला धोका मिळाला आहे. आता आम्ही सावध आहोत. मतचोरी संदर्भात आमचा पाठिंबा आहे” असं अबू आझमी म्हणाले.
‘सोनिया गांधींना जर्सी गाय वगैरे बोललं गेलं, हे अत्यंत चुकीचं’
“मराठी लोकं चांगले आहेत. कोणत्या गोष्टीची सक्ती करणं योग्य नाही, हे आमचं म्हणणं आहे” असं अबू आझमी यांनी सांगितलं. “सोनिया गांधींना जर्सी गाय वगैरे बोललं गेलं, हे अत्यंत चुकीचं होतं. राहुल गांधींनी कधीही सुरुवात केलेली नाही. सोनिया गांधींबद्दल जे बोलणं झालं, ते अपमानित करण्यासारखं नाही आहे का?” असा प्रश्न अबू आझमींनी विचारला.