अब्दुल सत्तार यांच्यासोबत मोठा गेम, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुत्राचा अर्ज थेट बाद, मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांचा व आमदार संजना जाधव यांचे अर्ज बाद करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा बँकेची निवडणुकी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांचे पुत्र समीर सत्तार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. आज पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. या यादीकडे जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव, आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार, मंत्री संजय शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्यासह अन्य उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. दरम्यान, सत्तार यांनी विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला केलेल्या विरोधामुळे यावेळी समीर सत्तार यांचा अर्ज मान्य होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचा अर्ज ठराला अवैध ठरवण्यात आला आहे.
समीर सत्तार यांचा अर्ज ठरवला बाद
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज बाद झाल्याने दिग्गजांना फटका बसला आहे. कन्नडच्या आमदार आमदार संजना जाधव यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचासुद्धा अर्ज अवैध ठरला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आक्षेपणानंतर उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी विधान परिषदेतून माघार घेतली होती. आता त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही समीर सत्तार सहभागी होऊ शकणार नाहीत.
सत्तार यांनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांचा व आमदार संजना जाधव यांचे अर्ज बाद करण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आमच्या अर्जांमध्ये किरकोळ चुका काढून ते अवैध करण्यात आले आहेत, असा दावा सत्तार यांच्याकडून करण्यात आला आहे. मुलाचा अर्ज बाद केल्यानंतर आता सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्ज बाद होताच सत्तार यांनी थेट मुंबई गाठण्याचे बोलून दाखवले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.