पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी…. सांगलीत काय घडलं?

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये अनैतिक संबंधातून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला; १२ दिवसांनंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.

पत्नीचं गावातच झंगाट, प्रियकराच्या मदतीने पतीचा गेम केला, अचानक 12 दिवसांनी.... सांगलीत काय घडलं?
wife husband (फोटो-प्रातनिधिक)
| Updated on: Apr 10, 2026 | 12:01 PM

महाराष्ट्रात सध्या कौटुंबिक गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता प्रेमात अंध झालेल्या पत्नीने आपल्या पोटच्या दोन मुलांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात ही थरारक घटना घडली आहे. सांगलीतील करोली टी येथील भारत करपे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी, दोन मुले आणि पत्नीचा प्रियकर अशा चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून करून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी १२ दिवसांनंतर छडा लावला.

नेमकं काय घडलं?

मृत भारत करपे आणि त्यांची पत्नी निलाबाई करपे यांच्यात गेल्या काही काळापासून वादाची ठिणगी पडली होती. निलाबाईचे गावातीलच बाबाजी करपे याच्याशी अनैतिक संबंध होते, ज्याला भारत करपे यांचा कडक विरोध होता. हाच अडथळा कायमचा दूर करण्यासाठी निलाबाईने प्रियकर बाबाजीच्या मदतीने पतीला संपवण्याचा कट रचला. २८ मार्च रोजी रात्रीच्या वेळी निलाबाई आणि बाबाजी यांनी भारत यांना गाठले. आधी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली.

हा गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी भारत यांचा मृतदेह छताला लटकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या गुन्ह्यातील अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या वडिलांच्या हत्येची माहिती असूनही निलाबाईच्या दोन्ही मुलांनी आईला साथ दिली. पतीचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने झाला असल्याचे सांगून नातेवाईकांची दिशाभूल करण्यात आली. तसेच पोलिसांना या प्रकरणाची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच याप्रकरणी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता प्रियकर बाबाजीच्या मदतीने तातडीने मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकून पुरावे नष्ट करण्यात आले.

ही घटना झाल्यानंतर १२ दिवस उलटून गेले. मात्र गावात या संशयास्पद मृत्यूबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ही गोपनीय माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीणकुमार कांबळे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. पोलिसांनी जेव्हा निलाबाई, तिची मुले आणि संशयित बाबाजी यांची कसून चौकशी केली, तेव्हा त्यांच्या जबाबात मोठी विसंगती आढळली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपींनी खुनाची कबुली दिली.

यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी याप्रकरणी पत्नी निलाबाई करपे, प्रियकर बाबाजी करपे आणि दोन मुले यांच्या विरोधात हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी सर्वांना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Follow Us