सांगली मविआतील वादावर आर. आर. आबांच्या लेकाची प्रतिक्रिया; म्हणाले, जयंत पाटील…

Rohit Patil on Sangli MVA : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. अशात सांगलीतील महाविकास आघाडीतील वादाने राज्याचं लक्ष वेधलं आहे. सर्वत्र याची चर्चा होतेय. आर, आर. आबांच्या लेकाने या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

सांगली मविआतील वादावर आर. आर. आबांच्या लेकाची प्रतिक्रिया; म्हणाले, जयंत पाटील...
| Updated on: Apr 28, 2024 | 6:17 PM

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादंग झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस या जागेवरून लढण्यास आग्रही असताना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील नाराज झाले. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. अशातच महाविकास आघाडीतील या वादामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. या सगळ्या वादावर आर. आर आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर आपलं सविस्तर मत मांडलं आहे.

रोहित पाटील म्हणाले…

सांगलीच्या वादाला जयंत पाटील जबाबदार आहेत असं मला वाटत नाही. घरातील नवरा बायकोची भांडण बोलल्यानंतर मिटतात, असं मी ऐकलं. माझं अजून लग्न झालेलं नाही. आता झालेले सांगलीमधील गैरसमज लवकरच दूर होतील. महाविकास आघाडीचे घटक आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतोय, असं रोहित पाटील म्हणाले.

आता असलेल्या सरकार बद्दलची चिड आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहे. तरुण वर्ग यावेळी कोणत्याही भावने च्या न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल. महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील आणि एक चांगला संदेश देशभर जाईल, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मोदींच्या सभेवर टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल कोल्हापुरात सभा झाली. या सभेवरही रोहित पाटील यांनी भाष्य केलं. शाहू छत्रपतींच्या गादीला विरोध करण्यासाठी स्वतः देशाच्या पंतप्रधानांना इथे यावं लागतं. हा विरोध शाहू छत्रपतींना नाही तर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराला आहे. नरेंद्र मोदींनी काल कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं. तरुणांची माथी कशी भडकतील याची दक्षता घेण्याचा प्रयत्न मोदींनी केला. पण लोकांचा शाहू महाराजांच्या विचारांवर विश्वास आहे, असं रोहित पाटलांनी म्हटलं आहे.

रतन टाटांनी आपल्या उद्योगांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणला आहे. त्यांचं योगदान आपण जाणतो. कोणाच्या तरी फोनवरून कोणाच्यातरी पाया पडत जातील, असं मला वाटत नाही. रतन टाटांचं नाव देशात आदराने घेतलं जातं. ज्यांचं नाव आदराने घेतलं जात नाही, ते का वाकत जाणार नाहीत. कदाचित वाकत जायला त्यांना फोनची देखील गरज नसावी. असा अर्थ दादांच्या बोलण्याचा असावा. रतन टाटा हे स्वाभिमानी आहेत. रतन टाटा बद्दल केलेलं वक्तव्य योग्य नाही हे लोकच दाखवून देतील, असं म्हणत रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर आपलं मत मांडलं.