पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले, केरळमध्येही महिला आहेत, मग…

भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपला सुनावले आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावरून संजय राऊत यांचा हल्लाबोल, म्हणाले, केरळमध्येही महिला आहेत, मग...
संजय राऊत
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 11:19 AM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली आहे. भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

लोकशाही नव्हे, रशिया-पाकिस्तानसारख्या निवडणुका

संजय राऊत म्हणाले की, भाजप ३६५ दिवस केवळ निवडणुका कशा जिंकायच्या याच सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री २०-२० दिवस बंगालमध्ये राहतात. येथे सत्तेचा आणि पैशाचा वारेमाप वापर केला जातो. खऱ्या अर्थाने याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येणार नाही. विरोधी पक्षाने निवडणुकाच लढवू नयेत, अशी भाजपची धारणा आहे. पुढे संजय राऊतांनी, ज्या प्रकारे पाकिस्तान आणि रशियामध्ये निवडणुका होतात, जिथे निकालाची घोषणा एक दिवस आधीच झालेली असते, तशाच प्रकारच्या निवडणुका आता भारतात होऊ लागल्या आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधानांनी भान ठेवून बोलावं

पंतप्रधानांनी महिला मतदारांच्या पाठिंब्याबाबत केलेल्या विधानावर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधानांनी बोलताना भान ठेवून बोलावे. महिला विधेयक कधीच मंजूर झाले आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठे आहे? जर महिलांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही जिंकत असाल, तर केरळमध्ये सर्वाधिक महिला साक्षर आहेत, तिथे तुम्हाला अपयश का आले? केरळमध्ये भाजपला का स्वीकारले गेले नाही? असा सवाल त्यांनी केला.

दिवा विझताना जास्त फडफडतो

भाजपच्या हिंदुत्वाचा दाखला देत राऊत यांनी भविष्यातील बदलाचे संकेत दिले. भाजप हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो, तर त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर दिवा विझताना अधिक फडफडतो, तशीच स्थिती आता भाजपची झाली आहे. इंदिरा गांधींचाही एकेकाळी सर्व राज्यांत प्रभाव होता, पण त्यांचाही पराभव झाला. सत्तेचा माज उतरल्याशिवाय राहत नाही, असेही ते म्हणाले.

“मोदी-शहांचा विजय”

शेअर मार्केट आणि रुपयाच्या घसरणीवरूनही त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. राऊत यांच्या मते, भाजपची सत्ता आल्यावर रुपया आणि शेअर मार्केट सुद्धा कोसळले आहे. हा लोकशाहीचा विजय नसून मोदी-शहांचा विजय आहे. अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून कापली गेली आहेत. हा निकाल म्हणजे देशात मोदींच्या पतनाची सुरुवात आहे.

Follow Us