
आखाती देशात सुरु असलेल्या युद्ध सुरु आहे. या युद्धाचा फटका भारताला बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गॅस आणि इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा आधी आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात गॅस आणि इंधनाची टंचाई बद्दलही भाष्य केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लॉकडाऊन, गॅस टंचाईसारख्या अफवा पसरवू नये. हा अपराध आहे. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी गॅसच्या रांगेत लोक आजारी पडतात. तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ स्वतः कबूल करत आहेत की गॅसची टंचाई आहे. एका ठराविक मर्यादेपलीकडे पुरवठा करता येणार नाही, असे खुद्द मंत्री म्हणत असतील, तर अफवा कोण पसरवतंय? असा सवाल संजय राऊतांनी केला.
आधी तुमच्या कॅबिनेटमध्ये एकमत आहे का ते तपासा. तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचे वितरण करावे लागत आहे. या अफवा गुजरातमधून पसरवल्या जात आहे. सर्वात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या आहेत. नोटाबंदीसंबंधीची पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली. गुजरातमध्ये ८ दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपला काळा पैसा आत टाकला. अमित शाहांच्या बँकेत एका तासात ५०० कोटी जमा झाले. त्या राज्यातील पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री असल्याने त्यांना ही बातमी लवकर कळली, असा दावा संजय राऊत यांनी केला.
गुजरातमध्ये सिलेंडरसाठी ज्या रांगा लागल्या आहेत, त्यावरुन लोकांच्या मनात धास्ती आहे की पुन्हा लॉकडाऊन लागेल. टंचाई होणार आहे. ही हवा गुजरातमधून आलेली आहे. पेट्रोल, डिझेलसाठी मोठमोठे ड्रम घेऊन लोक उभे आहेत. जर मुख्यमंत्र्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यांनी गुजरात राज्याच्या विरुद्ध करावा. देशभरात अफवा पसरवण्याचे काम तिथूनच होत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
सध्या सिलेंडरच्या वितरणासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागत आहे, ही राज्यासाठी शरमेची बाब असून सरकारने जनतेला घाबरवण्यापेक्षा पुरवठा सुरळीत करण्यावर भर द्यावा, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.