‘ही’ पाच राज्य नरेंद्र मोदी यांची सत्ता उलथवणार, संजय राऊत यांचं 2024 साठी भाकित काय?

पाकिस्तान लहान देश असून त्याच्याविरोधात सर्जिकल स्ट्राइक करता? पण हिंमत असेल तर चीनशी लढा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलंय.

ही पाच राज्य नरेंद्र मोदी यांची सत्ता उलथवणार, संजय राऊत यांचं 2024 साठी भाकित काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 3:08 PM

अहमदनगर : सध्या जनता शांत दिसत असली तरी लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. लोकांच्या मनात खदखद आहे. 2014  मध्ये याचं रुपांतर सत्ता परिवर्तनात होणार, असं भाकित संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलंय. विशेष म्हणजे पाच राज्यांतील जनता नरेंद्र मोदी यांच सरकार उलथवून टाकेल, असं राऊत म्हणालेत. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांतील मतदानानंतर मोदी सरकार कोसळेल. त्यामुळेच या राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप राऊत यांनी केलाय. संजय राऊत आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी एका विशेष मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हिंमत असेल तर चीनशी लढा

वारंवार पाकिस्तानविरोधात वातावरण निर्मिती करणाऱ्या केंद्र सरकारला संजय राऊत यांनी आव्हान दिलंय. ते म्हणाले, ‘ पाकिस्तान हा लहान देश आहे. भारतात पाकिस्तान नाही तर चीन घुसलाय. लडाख, अरुणाचलला गेला तर चीन किती घुसलाय ते कळेल. चीनविरुद्ध का लढत नाहीत. पाकिस्तान लहान देश असून त्याच्याविरोधात सर्जिकल स्ट्राइक करता? पण हिंमत असेल तर चीनशी लढा. त्याची घुसखोरी झिडकारून द्या. अखंड भारत हवाय तर घ्या पीओके. करा संपूर्ण हिंदुस्तान, महाशक्ती असाल तर चीनशी लढून दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी केलंय.

‘मी काळोखात भेटत नाही’

2019 मध्ये संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीची चर्चा होती. त्यावेळी नेमकं काय झालं होतं, असा सवाल राऊत यांना करण्यात आला. ते म्हणाले, ‘2019 मध्ये एकिकडे निकालाची मतमोजणी सुरु होती. तर उद्धव ठाकरे यांना सांगूनच मी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओककडे निघालो. त्यानंतर तिथेच रितसर भेट घेतली. काळोखात भेटीगाठी घेण्याची मला सवय नाही, असा टोमणा राऊत यांनी लगावला.

2019 मध्ये युती का तुटली?

भाजप शिवसेना युती 2014 सालीच तुटली होती. 2019 मध्ये आम्ही निवडणुकीसाठी पुन्हा एकदा आलो, मात्र देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्या भेटीत सत्तेचं समान वाटप असा फॉर्य्म्युला ठरला होता. मात्र निवडणूक झाल्यानंतर भाजपने तो पाळला नाही. इथेच युतीत आणखी मोठी ठिणगी पडल्याचं संजय राऊत यांनी सांगतिलं.