नितेश यांना पाताळातून शोधू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावे, राऊत आक्रमक; एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असेल तर…

संजय राऊत म्हणाले की, बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का, राष्ट्रपती तुमच्या घरी चंद्रपुरात, जंगलात गोट्या खेळत आहे का, त्यांचा स्टांप आणून ठेवलाय का, असा सवाल त्यांनी केला.

नितेश यांना पाताळातून शोधू, राणेंनी पोलिसांना सहकार्य करावे, राऊत आक्रमक; एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपवले असेल तर...
नितेश राणे आणि संजय राऊत.
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 4:48 PM

नाशिकः नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये. नितेश पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा दावा बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. एकीकडे सिंधुदुर्ग न्यायालयात नीतेश यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांने लपवले असेल तर…असे सूचक विधानही त्यांनी नितेश यांचे नाव न घेता केले. मात्र, यावर जास्त विचारणा केली असता, मी आताचं बोलत नाहीय. काही सांगता येत नाही ना, म्हणत त्यांनी कोणाचेही स्पष्ट नाव घेणे टाळले. राजकीय सुडापोटी आमच्यावर कारवाया केल्या. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

राष्ट्रपती गोट्या खेळत आहेत का?

पोलीस भरती गैरव्यवहाराची कागदपत्रे माझ्याकडे आली होती. ती मी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. हे प्रकरण गंभीर आहे, असेही राऊत म्हणाले. राज्य सरकार बरखास्त नाही केले, तर नाव बदलू, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. या वाक्याच्या संदर्भ घेत राऊत म्हणाले की, त्यांना नाव बदलावेच लागेल. मला त्यांचे नाव आवडते. मात्र, त्यांच्यासाठी नाव बदलण्याची व्यवस्था करू. बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का, राष्ट्रपती तुमच्या घरी चंद्रपुरात, जंगलात गोट्या खेळत आहे का, त्यांचा स्टांप आणून ठेवलाय का, असा सवाल त्यांनी केला.

ठाकरेंची धमकी काय असते?

राऊत म्हणाले की, मी राज्यपाल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही ओळखतो. ते महाराष्ट्रात आले नव्हते, तेव्हापासून त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. राज्यपालांना कोण धमकी देणार? उद्धव ठाकरेंची धमकी काय असते, याचा अनुभव महाराष्ट्रात घेतो आहे. हा साधा सरळ विषय आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून भ्रम निर्माण झाला. राज्यपालांनी कळवलं. आम्ही मान्य केलं. ते अत्यंत सभ्य गृहस्थ, सुस्वभावी आहेत, असा उल्लेखही त्यांनी केला.

बावनकुळे आत्ता आमदार झाले…

राज्यातले वातावरण अत्यंत छान आहे. कणकवलीत सुद्धा तणाव नाही. या देशात राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाची नोटीस मिळते. मात्र, अनेक गुन्हेगारांना राजाश्रय मिळतो, हे अनेक वर्ष घडत आलंय, असा उल्लेखही त्यांनी केला. जळगावमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगलेला वाद हे दोन कुटुंबातलं जुनं भांडण आहे, असे राऊत म्हणाले. बावनकुळेंचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. बावनकुळे काय म्हणतात 60 आमदार फुटतील म्हणून ते आत्ता आमदार झालेत, असा टोला त्यांनी हाणला.

इतर बातम्याः

Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश

नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?

Follow Us