निदा खानला MIM पाठिंबा, संजय शिरसाठांचा मोठा आरोप, ड्रग्ज प्रकरणी मास्टरमाईडचे नावही सांगितले
नाशिकमधील निदा खान प्रकरणात एमआयएमचा हात असल्याचा आरोप करत मंत्री संजय शिरसाठ यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नाशिकमधील खासगी कंपनीतील ड्रग्ज आणि फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ यांनी या प्रकरणावर टीका केली आहे. या संपूर्ण कटामागे ‘एमआयएम’चा (MIM) हात असल्याचा खळबळजनक आरोप संजय शिरसाठ यांनी केला आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही शिरसाठ यांनी स्पष्ट केले.
नारेगाव नशेखोरांचे केंद्र
निदा खानला ज्या भागातून अटक करण्यात आली, तो भाग अत्यंत संवेदनशील असून तिथे ड्रग्ज आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. नारेगाव हे नशेखोरांचे केंद्र बनले आहे. निदा खान ही तिथे एकटी नव्हती, तिला कोणाचा तरी मोठा पाठिंबा होता. मुंब्रा आणि पुणे यांसारख्या शहरांतून अशा प्रवृत्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदूंचा द्वेष करणे आणि धर्मांधता पसरवणे हे चुकीचे असून, या प्रकरणातील मोहोरे पकडले गेले असले तरी मास्टरमाइंड कोण आहे याचा तपास होणे गरजेचे आहे, असे संजय शिरसाठ म्हणाले.
इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या प्रकरणावर दिलेल्या विधानांचाही संजय शिरसाठ यांनी समाचार घेतला. निदा खानला पाठिंबा का दिला जात आहे? ती महिला नाशिकवरून थेट संभाजीनगरला कशी पोहोचली? ती गर्भवती असल्याची अफवा पसरवण्यात आली, मात्र त्यात तथ्य नव्हते. जलील आणि एमआयएमच्या नगरसेवकांच्या भूमिकेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी संजय शिरसाठ यांनी केली.
याबद्दल गृहखाते गंभीर असले तरी स्थानिक पोलीस या मुद्द्यावर तितकेसे गंभीर दिसत नाहीत. मी स्वतः पोलीस आयुक्तांना या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सायंकाळच्या वेळी अनेक भागात गरदुले फिरत असतात, पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर असणे आवश्यक आहे. अशा समाजकंटकांना ठेचून काढले पाहिजे,” असेही संजय शिरसाठ यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी संजय शिरसाठ यांनी मुंबई महापालिकेच्या कामावर भाष्य केले. भाजपचे महापौर आणि शिवसेनेच्या उपमहापौरांनी आता सोबत काम करून लोकांच्या मनातील गैरसमज दूर केले पाहिजेत. तसेच, रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. विरोधक नेहमीच विरोधात बोलणार. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असे संजय शिरसाठ म्हणाले.