साताऱ्यात चिता पेटवली अन् क्षणात… सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीने भयंकर घडलं, संतापजनक प्रकार समोर!

Satara : साताऱ्यात अंत्यसंस्कार सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांना पेटलेली चिता विझवावी लागली आहे. सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे नातेवेईकांवर ही वेळ आली आहे.

साताऱ्यात चिता पेटवली अन् क्षणात... सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीने भयंकर घडलं, संतापजनक प्रकार समोर!
Satara Hospital
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 31, 2026 | 6:55 PM

मृत्यू हे अंतिम सत्य आहे, जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. अशातच आता साताऱ्यात अंत्यसंस्कार सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकांना पेटलेली चिता विझवावी लागली आहे. सरकारी रुग्णालयाच्या एका चुकीमुळे नातेवेईकांवर ही वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे शासकीय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल झाल्यामुळे हे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस

साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणाचा कळस पाहायला मिळाला. मृत्यूनंतरही मृत शरीराची हेळसांड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दोन्ही नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले आणि याच ठिकाणी मोठी चूक झाली.

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

साताऱ्यातील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, त्यामुळे पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन

या घटनेनंतर साताऱ्यातील सरकारी रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांना देखील नातेवाईकांनी यावेळी जाब विचारला. यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिले. या घटनेमुळे काही काळ शासकीय रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, राज्य आणि केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रूपये आरोग्य सुविधांसाठी खर्च करते. सामान्य नागरिकांना चांगले उपचार मिळावे, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा खर्च केला जातो. मात्र बहुतांशी सरकारी रुग्णालयांमध्ये मोठा हलगर्जीपणा होत असल्याचे याआधीही समोर आलेले आहे.

Follow Us