
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्याचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी या प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोशी यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
आज विधानपरिषदेच्या सभागृहात शंभूराज देसाई यांनी आपबिती सांगितली. ते म्हणाले, “मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे, पण इतका भयानक अनुभव मला कधीही आला नव्हता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आमची युती झालेली असताना, आम्ही ३३ सदस्यांसह मतदानासाठी निघालो होतो. मात्र, या सदस्यांचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार करण्यात आली.
मतदान कक्षापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असताना साध्या वेशातील १०० हून अधिक पोलिसांनी आम्हाला रोखले. मी राज्याचा मंत्री असूनही मला पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले. यामध्ये माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जर मंत्र्यांवर अशी वेळ येत असेल, तर सभागृहात आणि राज्यात आम्ही सुरक्षित आहोत की नाही, अशी भीती वाटतेय, असे शंभूराज देसाई म्हणाले.
शंभूराज देसाई यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. आमदार विक्रम काळे यांनी कामकाज थांबवून या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निवेदन द्यावे, अशी मागणी लावून धरली. तर आमदार मकरंद पाटील यांनी केवळ निलंबन नको, तर संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ (Dismiss) करण्याची मागणी केली. सातारा एसपी एका पक्षाच्या घरगड्यासारखे वागले आहेत, अशा कडक शब्दांत आमदारांनी पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.
यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, सातारा SP तुषार दोशी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज सुरक्षित ठेवले जावे, जेणेकरून पुराव्यांशी छेडछाड होणार नाही. मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश नीलम गोऱ्हे यांनी दिले.
याप्रकरणी माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे संकेत दिले. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या २ सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फोडण्यात आले. मतदानाला जात असताना मंत्र्यांना आणि खासदारांना रोखणे ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही सध्या मुंबईत आहोत, पण साताऱ्यात परतल्यावर लोकांचा तीव्र उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा त्यांनी दिला. हा विषय केवळ सभागृहापुरता मर्यादित न ठेवता, कॅबिनेट बैठकीतही मांडला जाईल आणि समन्वय समितीच्या बैठकीत बावनकुळे यांच्याशी चर्चा केली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
दरम्यान साताऱ्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात पोलिसांकडून झालेली ही वागणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे आता गृह विभाग या निलंबनाच्या आदेशावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.