शेतात जाण्यापेक्षा…; नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला की टोला?

Nana Patole on CM Eknath Shinde : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. नाना पटोले यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. वाचा सविस्तर...

शेतात जाण्यापेक्षा...; नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला की टोला?
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 30, 2024 | 8:20 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला. सातारा जिल्ह्यातील दरेगाव या मूळ गावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आहेत. शेतात फेरफटका मारतानाचा व्हीडिओ एकनाथ शिंदे यांनी शेअर केला आहे. परदेशी कशाला जायाचं गड्या…, असं म्हणत या व्हीडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यत्र नाना पटोले यांनी भाष्य केलंय. एकनाथ शिंदेंना नजिकच्या काळात शेतीच करायची आहे. पण सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात. त्याचं भान ठेवा अन् राज्यातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करा. शेतकऱ्यांची भेट घ्या, असं नाना पटोले म्हणाले. ते कराडमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्री सध्या गावी आलेत. तेथून मी शेतात आहे. असं ट्विट करतात. पण राज्यात दुष्काळ आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकडे त्यांनी लक्ष द्यावे. पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे. जनतेच्या लोकांच्या प्रश्न मांडले विचारले की सत्तेवर असलेल्यांना स्टंट वाटत आहे. ही बाब चुकीची आहे, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे यांचं ट्विट

परदेशी कशाला जायाचं
गड्या आपला गाव बरा
शेत पिकाची दुनिया न्यारी
वसे जिथे विठूरायाची पंढरी…

लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.

यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.

जितेंद्र आव्हाडांच्या कृतीवर भाष्य

काल महाडच्या चवदार तळ्याच्या परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केली. मात्र यावेळी अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. यावरून प्रचंड टीका केली जात आहे. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसची भूमिका काय? यावर नाना पटोले बोलते झाले. बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला, याचं समर्थन कुणीही करणार नाही.पण मनुस्मृती अभ्यासात यावी हा भाजपचा प्रयत्न आहे. त्याला काँग्रेस नेहमीच विरोध करेल. अभ्यासक्रमात मनुस्मृती आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव आहे. मात्र ते आम्ही होऊ देणार नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us