सत्यजित तांबे यांना मोठा दणका! रास्ता रोको आंदोलन करणं भोवलं, तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल
Satyajit Tambe : आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. आता तांबे यांच्यासह 300 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून आज अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं होते. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा, या मागणीसाठी आज सकाळी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह व इतर 300 ते 350 आंदोलकांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सत्यजित तांबे यांच्यासह 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल
आज विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र आता या आंदोलनानंतर तांबे यांच्यासह इतर आंदोलकांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. वावी पोलिस ठाण्यात तांबे यांच्यासह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते सत्यजित तांबे ?
आजच्या आंदोलनावेळी बोलताना आमदार तांबे यांनी म्हटले होते की, नाशिक-पुणे रेल्वेसाठी नागरिक आणि तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ज्या मार्गाने रेल्वे ठरली त्यात बदल होऊ नये ही मागणी आहे. 500 कोटी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. प्रांत शशिकांत मंगरुळे चर्चेसाठी आले, 22 फेब्रुवारी 2026 ला रेल्वेसाठी प्रश्न मांडला, त्यानुसार समिती नेमली आहे. आम्ही दोन मागण्या केल्या आहेत. काकोडकर समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये. काकोडकर यांना शास्त्रज्ञ म्हणून नेमले आहे, दोन विभागीय आयुक्त दिले आहेत, रेल्वे बोर्डाचा अधिकारी सुद्धा नेमला आहे. जनभावनेचा विचार केला जावा, फक्त तांत्रिक कारणांचा विचार करू नये आणि ठरल्याप्रमाणे हा मार्ग जुन्याच आराखड्याने व्हावा अशी आमची मागणी आहे. समृद्धी महामार्गावर सुद्धा आंदोलन झालं, नागरिकांना त्रास देणे आमचा हेतू नव्हता. शासनाच्या माध्यमातून आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे.