शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?

महाविकास आघाडीची जाहीर सभा आज बीकेसी येथे झाली.यावेळी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आदींची देखील भाषणे झाली. शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न पाहणारे हे सरकार असून त्यांना हटवलं पाहीजे अशी मागणी या सभेत शरद पवार यांनी केली.

शेतकऱ्यांचं किती लाखांचं कर्ज माफ करणार?; शरद पवार यांची महागॅरंटी काय?
शरद पवार
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 06, 2024 | 9:39 PM

राज्यात निवडणूकीचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सभांचा धडाका लावला आहे. नागपुर येथील संविधान संमेलनाला उपस्थित राहील्याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतही सभा घेतली. बीकेसी येथे झालेल्या या सभेत राहुल गांधी यांनी घोषणांचा अक्षरश: पाऊसचा पाडला. महायुतीच्या दशसूत्रीला महाविकास आघाडीने आपल्या गॅरंटीने उत्तर दिले. या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार भाषण केले. महाविकास आघाडी सत्तेत आली तर कृषी क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडविले जातील आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले आहे.

शरद पवार म्हणाले की तुम्ही लोकसभेच्यावेळी ४८ जागांपैकी ३१ जागा आम्हाला दिल्या. आम्हाला शक्ती दिली. आता विधानसभा आहे. राज्य कसं चालवायचं याचा निकाल घेण्याची ही वेळ आली आहे. गेल्या पाच वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार सोडलं तर बाकीचा कालखंड महाराष्ट्राला मागे नेणारा ठरला आहे. महाराष्ट्र हे आर्थिक दृष्ट्या शक्तीशाली राज्य आहे. देशातील एक नंबरचं राज्य. आज भाजपच्या हातात सत्ता गेल्यावर आपलं राज्य सहा नंबरला गेलं. गुंतवणुकीत आपलं राज्य मागे राहिले आहे असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारं राज्य होतं. आज स्त्रियांवर अत्याचार होत आहे. त्याचे आकडे पाहिले तर चिंता वाटणारं चित्र आहे. राज्यात ६४ हजार महिला आणि मुली बेपत्ता आहे. त्याचा शोध लागत नाही. अशी परिस्थिती कधी नव्हती. शिक्षणासाठी महाराष्ट्र प्रगत राज्य होतं. आज शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार सुरू आहे. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात घसरला आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

मुंबईचे पुतळे वाऱ्याने उद्ध्वस्त होत नाहीत

शिवाजी महाराज देशाच्या स्वाभिमानाचं प्रतिक आहे. हल्ली भ्रष्टाचार कोणत्या टोकाला गेला याचं उदाहरण पुतळा पडण्याचं आहे. सिंधुदुर्गात पुतळा उभा केला. त्यातही भ्रष्टाचार झाला. शिवाजी पार्कवर अनेक वर्षापासून शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गेटवेवर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. समोर समुद्र आहे. समुद्राचं वारं येतं. हजारो लोक पुतळा बघतात. त्याला काही झालं नाही. पण मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होतं आणि पुतळा उद्ध्वस्त होतो. आणि सरकार म्हणते समुद्राच्या वाऱ्याने पुतळे उद्ध्वस्त झाला. मुंबईचे पुतळे वाऱ्याने उद्ध्वस्त होत नाहीत. पण सिंधुदुर्गाती पुतळा वाऱ्याने होतो. त्याचं कारण तिथे भ्रष्टाचार झाला. शिवाजी महाराजांचा अवमान झाला असा घणाघात शरद पवार यांनी यावेळी केला.

३ लाखपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल

शरद पवार पुढे म्हणाले की कृषी क्षेत्राची गॅरंटी आम्ही देत आहोत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आम्ही ७१ हजार कोटींचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्यांच्या शेतीला १२ टक्क्यांचे व्याज ६ टक्क्यावर आणले. नंतर तो ३ टक्क्यांवर आणला. आज आम्ही सांगतो की, तुम्ही सत्ता दिल्यास कृषी समृद्धी योजना राबवली जाईल. त्यात ३ लाखपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल. नियमित कर्ज फेडत असतो त्याला ५० हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत दिली जाईल. शेतकरी बळीराजा आहे. तुमच्या माझ्या भूकेची समस्या सोडवणारा आहे.आज आत्महत्या करण्याची परिस्थिती त्याच्यावर आली आहे. भाजप त्यांच्या दुखाकडे ढुंकून पाहत नाही. त्यावर उत्तर शोधलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आलो आहोत असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us