रामनवमी यात्रेत रहाट पाळणा तुटला अन् मोठा अनर्थ घडला; महिनाभर मृत्यूशी झुंज दिली पण.. घटना काय?
रामनवमी उत्सव सुरू असतांना शिर्डीत रहाट पाळणा तुटल्याची घटना घडली होती. त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यात महिनाभरानंतर आणखी एक दुर्दैवी घटना समोर आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक : रामनवमी उत्सवात शिर्डीत सर्वत्र आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण असतांना एक मोठा अपघात घडला होता. साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील लावण्यात आलेल्या पाळण्यात खालीवर होणा-या ट्रॉलीचा एक पाळणा अचानक तुटला होता. यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले तर काहीजण पाळण्यात बसण्यासाठी बाजुला उभे होते त्यांच्यावर हे पाळणे आदळल्याने अनेकजण जखमी झाले होते. या दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे ( वय-31 ) किशोर पोपट साळवे ( वय-36 ) यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झालीय. याशिवाय भूमी अंबादास साळवे ( वय-11 ) हिला डोक्याला मार लागला होता. याशिवाय प्रविण अल्हाट ( वय ४५) हा तरुणही जखमी झाला होता. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते.
यामध्ये किशोर पोपट साळवे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नाशिकयेतहे उपचार सुरू होते. जवळपास महिनाभर किशोर साळवे यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र उपचारा दरम्यान किशोर यांचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यामध्ये किशोर यांची पत्नी ज्योती साळवे उपचार घेत असून त्यांची प्रकृतीही गंभीर असून मुलीची तब्येत मात्र स्थिर आहे. या अपघाताने खरंतर संपूर्ण शिर्डीतील रामनवमी उत्सवाला गालबोट लागले गेले होते. याच अपघातात किशोर साळवे आणि त्यांच्या पत्नीच सर्वाधिक गंभीर जखमी झाल्या होता.
उपचारा दरम्यान किशोर यांचे दोन्ही पाय काढण्यात आले होते. अपघातात त्यांचे पाय अक्षरशः निकामी झाले होते. त्यात डावा पाय गुडघ्यापासून खाली कापण्यात आला होता. त्यानंतर दूसरा पायही काढण्यात आला होता. त्यामुळे किशोरचे दोन्ही पाय अपघातात गेले होते. यामध्ये आता त्यांचा नाशिक येथे उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.
शिर्डी पोलिसांनी यापूर्वीच पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये स्थानिक जमीन मालक असून त्या ठिकाणी हा रहाट पाळणा लावण्यात आला होता. तर दोघे रहाट पाळण्याचे मालक आणि ऑपरेटर आहेत. याबाबत शिर्डी पोलिसांचा तपास सुरू होता.
खरंतर किशोर यांच्यावर उपचार सुरू असतांना दुसऱ्या बाजूला पत्नीवरही उपचार केले जात होते. त्यामध्ये पुढील महिण्यात पत्नी ज्योती यांच्यावर शस्रक्रिया केली जाणार होती. अशातच किशोर यांचे पाय निकामी झाले होते. मात्र जगण्याची उमेद हारलेले नव्हते. मात्र, 21 एप्रिलला पुन्हा तब्येत खालवल्याने किशोर यांना आयसीयूत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
किशोर यांच्या छातीला आणि पायाला जबर मार लागला होता. मात्र, उपचार केले जात असतांना त्यांचे शरीर प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण झाले होते. हृदयातील रक्तवाहिन्या बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरंतर साळवे हे कुटुंब रस्त्याच्या कडेला वस्तु विक्री करून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. साळवे यांची आई रस्त्याच्या कडेला खेळणी किंवा इतर वस्तु विकण्याचे काम करत आहे. तर हातावर पोट असलेल्या कुटुंबावर हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जखमी दाम्पत्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते आणि एका स्वयंसेवी संस्थेने देऊ केलेली रक्कमही कुटुंबाला सुपूर्द केली होती. पीडितेला सरकारी मदत देण्याचे आश्वासनही विखे पाटील यांनी दिले आहे.