
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. या मिळवलेल्या मोठ्या यशानंतर आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबाबत मोठे विधान केले आहे. संख्याबळाअभावी ठाकरे पुन्हा सभागृहात पोहोचू शकतील का, याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकज भोयर यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या निकालात महायुतीला मिळालेले यश हे सरकारने केलेल्या कामाची पावती आहे. जनतेने विरोधकांना नाकारले असून, विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने त्यांची त्रेधा तिरपट उडाली आहे. याच कारणामुळे काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असावा, असे पंकज भोयर म्हणाले.
यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. असं वाटतंय की उद्धव ठाकरे पुन्हा कोणत्याही सभागृहात पोहोचू शकणार नाहीत, असे विधान पंकज भोयर यांनी केले.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत मे २०२६ मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भोयर यांनी ठाकरेंच्या अडचणींकडे लक्ष वेधले. विधानसभेतील सध्याच्या गणितानुसार, ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार आहेत. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा (साधारण २९-३० मते) गाठणे त्यांच्यासाठी कठीण आहे. ठाकरेंना पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या जादा मतांची गरज भासणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत सध्या राज्यसभेच्या जागांवरूनही ओढाताण सुरू असल्याची चर्चा आहे. यावरुनच पंकज भोयर यांनी टीका केली.
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या राजकीय प्रवेशावरही पंकज भोयर यांनी टोला लगावला. ते अभिनेते आहेत, पण ते सक्रिय राजकारणात राजकीय चर्चा कधीपासून करायला लागले? यावर विश्वास बसत नाही, असे पंकज भोयर यांनी म्हटले.