सोलापूर : 81 टक्के मिळवलेल्या विद्यार्थीनीनं कमी गुण मिळतील या भीतीनं दहावी निकालाच्या (SSC Result 2022 Online) पूर्वसंध्येलाच आत्महत्या केली. यामुळे संपूर्ण माढा तालुका (Madha Crime News) हळहळलाय. शेततळ्यात उडी घेत विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवलंय. मुलीनं आत्महत्या (10th Student Suicide)केल्यानं तिच्या घरातल्यांनाही मोठा धक्का बसलाय. निकालाच्या पूर्वसंध्येला या विद्यार्थीनीनं टोकाचं पाऊल उचललं. आपल्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण मिळतील, या भीतीने तिनं आत्महत्या केली. ही हृदय हेलावून टाकणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. माढा तालुक्याती घोटी गावात या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. अमृता दाजीराम लोंढे (वय 17) असं त्या आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. दहावीच्या निकालाच्या पूर्वसंध्येलाच घडलेल्या या घटनेमुळे गावात दुखवटा निर्माण झालाय.
अमृता हिने 2022 मार्च मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. मात्र या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील की नाही याबाबत अमृताला शंका होती. तसेच कमी गुण मिळाले तर लोकं काय म्हणतील या तणावात देखील ती असायची.
गुरुवारी मध्यरात्री अमृता घरातून कुणालाही न सांगता निघून गेली होती. तिचा शोध घेतला गेला. मात्र ती जिथं सापडली त्यानं सगळ्यांनाच हादरा बसला. शेतकरी शिवराम लोंढे यांच्या शेततळ्यात तिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. तिचा मृतदेह पाहून अमृताच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळळा होता.
अमृताचे वडील टीव्ही दुरुस्तं करण्याचे काम करतात तर आई शेतमजूरी करते. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत ते अमृताला शिक्षण देत होते. घोटी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक शाळेत अमृता शिकत होती. निकालाच्या पूर्वसंध्येलाच कमी गुण मिळतील या भितीने शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या केलेली अमृता शाळेत गुणवंत झाली होती. याच विद्यार्थिनीला निकाला दिवशी मात्र 81 टक्के इतके गुण मिळालेत. आपल्याला मिळालेलं यश पाहण्याआधीच तिनं जगाचा निरोप घेतला होता.
या दुर्देवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. टेभुर्णी पोलिसांत घटनेची नोंद झाली असून वडिलांनी या आत्महत्येप्रकरणी पोलिसांत जबाब नोंदवला आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांनो दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाले, म्हणून खचून जाण्याची गरज नाही. किंवा नापास जरी झालात, तरिही ही काही आयुष्यातली पहिली आणि शेवटची परीक्षा नाही. दहावीत नापास झालेल्या अनेकांनी आयुष्यात घवघवीत यश मिळवलेलं आहे. शिवाय दहावी हा काही तुमच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाचा निकाल नाही. त्यामुळे दहावीचा निकालाचा फार विचार करुन वेडंवाकडं पाऊल उचलू नका. अपयश जरी आलं, तरी परीक्षेत पुन्हा पास होण्याची संधी मिळते. कमी गुण मिळाले, तरी पुढच्या परीक्षेत पुन्हा चांगलं करुन दाखवण्याची संधी नेहमीच मिळते.