कु. प्रणितीताई यांचे पत्र पाहिले… माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या…; सोलापुरात बेरोजगार तरुणाचे पत्र व्हायरल

| Updated on: Mar 26, 2024 | 12:24 PM

Unemployed youth wrote a letter To Praniti Shinde Ram Satpute : सोलापूरच्या बेरोजगार तरूणाचं लोकसभेच्या उमेदवारांना विचारला जाब; 'त्या' पत्राची सोलापुरात चर्चाच चर्चा... युवकाच्या पत्रात नेमकं काय? दोन युवा उमेदवारांना पत्र लिहित कोणते मुद्दे मांडले? वाचा सविस्तर...

कु. प्रणितीताई यांचे पत्र पाहिले... माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या...; सोलापुरात बेरोजगार तरुणाचे पत्र व्हायरल
Follow us on

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या निवडणूक लढत आहेत. तर भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवार विद्यमान आमदार असून लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये एक वाद रंगला आहे. तो म्हणजे स्थानिक आणि उपरा असा. प्रणिती शिंदे यांनी सातपुते हे उपरे असल्याचं म्हटलं आहे. बाहेरच्या उमेदवारांना कसं स्वीकारणार? असा सवाल प्रणिती यांनी केला आहे. तर, सातपुते यांनीही पलटवार करताना तुमचे पूर्वजही उपरेच आहेत. तुम्ही मूळचे सोलापूरचे नाही, असा हल्ला चढवला आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये लेटरवॉर सुरू असतानाच जिल्ह्यात एका बेरोजगार तरुणाचं लेटर व्हायरल झालं आहे. त्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

सोलापुरातील एका बेरोजगार युवकाने भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्याने सोलापुरातील विविध समस्या मांडतानाच तरुणांच्या व्यथाही मांडल्या आहेत. या पत्रातून दोन्ही नेत्यांना उपरोधिक टोलेही लगावण्यात आले आहेत. हे पत्र जिल्ह्यात वाऱ्यासारखं व्हायरल झालं आहे. त्यावरून जोरदार चर्चाही रंगली आहे. अनेक तरुण हे पत्र जसंच्या तसं सोशल मीडियावर व्हायरल करत असून त्यावर व्यक्त होतानाही दिसत आहेत.

काय आहे पत्रात?

कु. प्रणितीताई यांचे पत्र पाहिले. अत्यंत कमी शब्दांमध्ये संस्कार आणि संस्कृतीचे दर्शन तुम्ही सोलापूरकरांना करून दिलं. त्याला प्रतिउत्तर देत रामभाऊंनीही अत्यंत गंभीर आणि खोचक तसेच शिस्तबद्ध उत्तर दिलेले दिसत आहे. दोघांनीही स्वतःचे संस्कार जपत शिस्तीचे प्रदर्शन करत उत्तरांची सौम्य आगपाखड केली आहे, तो तुमच्या राजकारणाचा भाग झाला..! परंतु माझ्या सारख्या तरुणाला आजही या प्रश्नांची उकल झाली नाही, ती म्हणजे मला सोलापूर सोडून का जावं लागतं? मला शिक्षण तर मिळतंय पण नोकरी का नाही? मला टॅक्स नोटीस तर वेळेवर येते, पण पाणी का नाही मिळत?, असा सवाल या तरुणाने पत्रातून केला आहे.

तरीही तुमचं स्वागत आणि अभिनंदन

तुम्ही दोघेही तरुण आमदार आहात. उच्चशिक्षित आहात. तरीही माझ्यासारख्या तरुणास कधी जातीच्या नावे लढावे लागते, तर कधी एकत्र यावे लागते. परंतु आम्हाला कधीच तुम्ही शिक्षणाच्या नावे एकत्र करण्याच्या प्रयत्न केलाच नाही. रण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय. दोघांनीही पाच वर्षे विधानसभेचे नेतृत्व केलं.पण आमच्या सारख्या तरुणांना फक्त रोजगार आणि उद्योगांच्या नावे आश्वासनांवर झुलवत ठेवलं.असो, तरी तुम्हा दोघांचेही स्वागत आणि अभिंनदन..!, असंही त्या पत्रात म्हटलं आहे.

“तुम्ही केवळ पक्षाचे प्रतिनिधी”

तुम्हा दोघांतील एक जण राजकीय वारश्याने तर एकजण राजकीय वरदहस्ताने ह्या लोकसभेसाठी उभे आहात! परंतु कोणीही जनसामान्यातून उभे राहिलेले नाही. तुम्ही दोघेही आपापल्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहात. परंतु लोकांचे नाही…!, असं म्हणत दोन्ही युवा नेत्यांना या युवकाने पत्र लिहिलं आहे.

असो, कुणी ऊसतोड कामगाराचा दलिताचा मुलगा म्हणून पंचतारांकित हॉटेलात आरोळी न फोडता, मी एक नारी म्हणून मुंबईतील घरामध्ये परंपारिक मतदारांची थट्टा नाही करणार एवढच आश्वासन गरजेचे आहे..!, असा संदेश या पत्रात लिहिण्यात आला आहे. या पत्राची सोलापुरात जोरदार चर्चा रंगताना पाहायला मिळतं आहे.