त्यावेळी ‘मातोश्री’वर नेमकं काय घडलं होतं? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा खुलासा

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या जन्मगावी माढ्याच्या वाकावमध्ये गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जोरदार भाषण केलं.

त्यावेळी मातोश्रीवर नेमकं काय घडलं होतं? आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा खुलासा
Reporter Sandip Shinde | Edited By: Chetan Patil | Updated on: Feb 10, 2023 | 8:03 PM

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आपल्या जन्मगावी माढ्याच्या वाकावमध्ये गुंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धार लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून मोठा खुलासा केलाय. महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणणं किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार निर्मितीचा फाऊंडर तानाजी सावंत होता, असं मोठं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलंय. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात आपल्यावर अन्याय झाला होता. या अन्यायामुळे आपण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून नाराजी व्यक्त केली होती. तसेच ‘मातोश्री’ची पायरी कधीही चढणार नाही, असा इशारा दिला होता, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

“अन्यायाच्या विरोधात लढा कसा असतो हे दाखवून देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आणि ते घडलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सरकार निर्मितीचा फाऊंडर तानाजी सावंत होता”, असं ते यावेळी म्हणाले.

त्यावेळी ‘मातोश्री’वर नेमकं काय घडलं होतं?

तानाजी सावंत यांनी यावेळी आपण ‘मातोश्री’वर शेवटचं जेव्हा गेलो होतो तेव्हा थेट इशारा देऊन आलो होतो, असं सांगितलं. “2019 ला ‘मातोश्री’ समोर जाऊन माझ्यावर अन्याय का केला? असं विचारणारा तानाजी सावंत होता. मला उत्तर नाही मिळाले तर फळं भोगावी लागतील. परत मातोश्रीची पायरी चढणार नाही, असा इशारा मी ठाकरेंसमोर तेव्हाच दिला होता”, असं वक्तव्य त्यांनी केलं.

“एकनाथ शिंदेंनी मला मंत्रीपदाच्या रुपातच मंत्रालयाची पायरी चढवायला लावली”, असंही ते यावेळी म्हणाले.

‘नरेंद्र मोदी महादेवाचा अवतार’

“विश्वाचं कल्याण करणारे पंतप्रधान नरेद्र मोदींना मी खऱ्या अर्थाने महादेवाचा अवतार मानतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 48 तास काम करत जनसेवा करणारा पहिला कामाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला”, अशी शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

शिवसेनेतील वाद कुठपर्यंत जाणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे पाठ फिरवली.

शिंदे गटाकडून थेट पक्षावर दावा सांगितला जातोय. पण तो दावा ठाकरे गटाने फेटाळला आहे. या दोन्ही गटांची लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे.

येत्या 14 फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे. त्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि चिन्हावर कुणाचा हक्क या विषयावर युक्तिवाद झालाय. तिथला युक्तिवाद आता पूर्ण झालाय. निवडणूक आयोग त्यावर कधीही निकाल देऊ शकतो.

महाराष्ट्रात आगामी काळात मोठमोठ्या शहारांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यापाठोपाठ विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा वाद आता कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us