सोन्याचं धोतर, चंदनाचा हार आणि…, विठुरायाला भक्ताकडून सव्वा 2 कोटींचं गुप्त दान

विठुराया आणि भक्तांचं असलेल्या अवीट नात्याबद्दल कितीही बोललं तरी कमी ठरणार नाही. विठुरायाचा आशीर्वाद लाभल्यामुळे भरुन पावलेले भक्त सढळ हातांनी आणि खुल्या मनाने दानधर्मही करतात.

सोन्याचं धोतर, चंदनाचा हार आणि..., विठुरायाला भक्ताकडून सव्वा 2 कोटींचं गुप्त दान
| Edited By: Chetan Patil | Updated on: May 01, 2023 | 6:14 PM

पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायासोबत भक्तांचं आणि वारकऱ्यांचं असेलेलं नातं हे शब्दांत कधीही व्यक्त होऊ शकणार नाही, असं आहे. वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपुरात दाखल होतात. ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहतात. सावळ्या विठ्ठलाच्या केवळ दर्शनाने ते व्याकूळ होतात. विठुरायाकडे आपलं गऱ्हाणं मांडतात, आपल्याला होणाऱ्या दु:ख, वेदना, त्रास यांची माहिती देतात. विठुरायाकडे आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात आणि काही गोष्टींसाठी ते विनंती देखील करतात.

विठुराया आणि भक्तांचं असलेल्या अवीट नात्याबद्दल कितीही बोललं तरी कमी ठरणार नाही. विठुरायाचा आशीर्वाद लाभल्यामुळे भरुन पावलेले भक्त सढळ हातांनी आणि खुल्या मनाने दानधर्मही करतात. ते समाजकार्यात स्वत:ला झोकून देतात. किंवा काही भक्त गुप्त दान करुन विठुरायाच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. आतादेखील पंढरपुरात अशाच एका भक्ताने विठुराला दोन किलो सोन्याचं अनोखं दान केलं आहे.

विठुरायाला सव्वा दोन कोटींचे दान

विठ्ठलाच्या जालन्याच्या एका भक्ताने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर गुप्त दान केलं आहे. या भक्ताने आपल्या विठुरायाला सोन्याचे धोतर, चंदनाचा हार आणि कंठी दान केली आहे. या गुप्त दानची किंमत तब्बल सव्वा दोन कोटी रुपये इतकी आहे.

याआधीही 1 कोटी 80 लाख रुपयांचे दान

विशेष म्हणजे गुप्त दान करणाऱ्या जालन्याच्या याच भाविकाने याआधी नाव न सांगण्याच्या अटीवर तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे दान केलं होतं. त्यानंतर पुन्हा सव्वा दोन कोटी रुपयांचं गुप्त दान या भक्ताकडून करण्यात आलं आहे.

सव्वा कोटी रुपयांच्या दानमुळे गरिबांचा देव असणाऱ्या विठुरायाची श्रीमंती आणखी वाढली आहे. कारण विठ्ठलाच्या खजिन्यात एकाच भक्ताकडून सुमारे तीन कोटींचे दान मिळाले आहे.

पंढरपूर हे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं इथे दैवत आहे. या दैवताच्या दर्शनासाठी लाखोंचा जनसागर या ठिकाणी येतो. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्यावेळी पंढरपुरातलं वातावरण हे पाहण्यासारखं असतं. या वातावरणात चैतन्य असतं. लाखो भाविक वारी करुन पंढरपुरात दाखल होतात. वारकऱ्यांच्या भक्तीचं जगभरात कौतुक होतं.

दुसरीकडे पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर प्रशासनाकडून वारकऱ्यांची नेहमी काळजी घेतली जाते. वारकऱ्यांच्या भावनांचा आदर केला जातो. याशिवाय प्रत्येक सणाला मंदिर प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने गाभाऱ्याचा परिसर सजवला जातो. मंदिराचं प्रवेशद्वार ते गाभाऱ्यापर्यंत याआधी द्राक्षांची किंवा रंगेबीरंगी फुलांची आरस दिसली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us