Surat Bus Accident : सहावा मृतदेह कुणाचा? डीएनए नमुन्यासाठी कुणीच आलं नाही; नातेवाईकाचा शोध सुरू

सुरतजवळच्या बस अपघातात सात प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांचे मृतदेह भाजल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. एका मृतदेहाची ओळख पटली असली तरी, सहा मृतदेहांची ओळख डीएनए नमुन्यांवर अवलंबून आहे. पाच मृतदेहांसाठी नातेवाईकांनी नमुने दिले आहेत, पण सहाव्या मृताच्या नातेवाईकांचा शोध अद्याप सुरू आहे.

Surat Bus Accident : सहावा मृतदेह कुणाचा? डीएनए नमुन्यासाठी कुणीच आलं नाही; नातेवाईकाचा शोध सुरू
सुरत बस अपघातात अनेकांनी गमावला जीव
| Updated on: Jun 03, 2026 | 1:09 PM

सुरतच्या बारडोली गावाजवळ महाराष्ट्रातील एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. बसने पेट घेतल्याने या बसमधील सात प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. मृतदेह अत्यंत विचित्र पद्धतीने जळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. सातपैकी फक्त एकाच मृतदेहाची ओळख पटली आहे. बाकीच्या सहा मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांकडून डीएनए नमुने घेण्यात आले आहेत. सहापैकी पाच नातेवाईकांनी नमुने दिले आहेत. तर सहाव्या व्यक्तीचा कोणीच नातेवाईक आला नसल्याने डीएनए नमूना मिळू शकला नाही. त्यामुळे सहाव्या व्यक्तीची ओळख पटणे कठिण होणार आहे. तसेच या सहाव्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

बारडोलीजवळील भीषण बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे डीएनए तपासासाठी प्रयोगशाळा पाठवण्यात आले आहेत. सातपैकी एका मृतदेहाची ओळख यापूर्वीच पटली आहे. सहा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घेतला जात आहे.पाच मृतांच्या नातेवाईकांनी डीएनए नमुने दिले आहेत. एका प्रवासी महिलेचा कोणीही नातेवाईक आला नसल्यामुळे तिच्या नातेवाईकाचा डीएनए घेता आलेला नाही. या सर्व डीएनएचे नमुने सुरतच्या प्रयोगशाळेत पाठवले जात आहे.

दुपारी अहवाल येणार

आज दुपारी 3 वाजेपर्यंत डीएनए अहवाल येण्याची शक्यता आहे. अद्याप एका महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील धनलक्ष्मी गजानन जाधव, सुरतच्या चलथान येथील मनीषा राजेंद्र पाटील, सुरतच्या पर्वतगाम येथील नरेशभाई मनोहर नेरपगार, सुरतच्या पलसाना येथील मधुकर यशवंत पाटील आणि अर्चना मधुकर पाटील यांनी डीएनएचे नमूने दिले आहेत. डीएनए अहवालानंतर मृतांची अधिकृत ओळख जाहीर होणार आहे. मात्र, पाच जणांची ओळख पटणार असली तरी सहाव्या महिलेचे नातेवाईक अद्याप सुरतला आलेले नाहीत. या महिलेबाबत कुणी विचारपूसही केलेली नाही. त्यामुळे या महिलेची ओळख पटणे कठिण झाले आहे.

चालकाला अखेरचा निरोप

दरम्यान, जळगावातील एका चालकाचाही कालच्या अपघातात मृत्यू झाला आहे. या चालकाला श्रद्धांजली वाहण्यासााठी जामनेर बस आगाराच्या दोन बसेस भरून कर्मचारी, वाहक चालक सर्व स्टाफ श्रद्धांजली वाहण्यासाठी कुऱ्हा गावाच्या पानाचे येथे दाखल झाला आहे. बस चालक घनश्याम बरकले यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांना आज अंतिम निरोप दिला जात आहे. बरकले यांची अंत्ययात्रा निघाली असून या अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित आहेत.

Follow Us