हिंगोलीत एसटी कर्मचाऱ्यांची गाजर दाखवून निदर्शनं, परिवहनमंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 41टक्के पगार वाढ दिल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. सरकारनं आम्हाला पगारवाढीचं गाजर दाखवल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. पण विलिनीकरणाच्या मागणीवर हिंगोलीतील कर्मचारी ठाम आहेत.

हिंगोलीत एसटी कर्मचाऱ्यांची गाजर दाखवून निदर्शनं, परिवहनमंत्र्यांना पदावरून हटवण्याची मागणी
सरकारनं कर्मचाऱ्यांना गाजर दाखवलं, अशी प्रतिक्रिया देत हिंगोलीतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन चालूच ठेवलं.
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 5:24 PM

हिंगोलीः शहरातील बस स्थानकात 26 व्या दिवशीही एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आंदलन सुरुच आहे. काल बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी महामंडळातील कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ दिली. मात्र राज्य सरकारमध्ये महामंडळलाचे विलिनीकरण करणे हीच कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम असून मुंबईतील आझाद मैदानासह राज्याभरातील सर्वच डेपोमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. परिवहन मंत्र्यांनी पगारवाढ देऊन केवळ गाजर दाखवल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत आंदोलकांनी गाजर दाखवून सरकारचा निषेध केला.

पगारवाढ नको, विलिनीकरण हवे!

हिंगोली बस स्थानकात एसटी कामगारांची आजही घोषणाबाजी सुरुच आहे. परिवहन मंत्र्यांनी पगारवाढ दिली. मात्र आम्हाला ती मान्य नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

‘परिवहन मंत्र्यांना पदावरून हटवा’

हिंगोली येथील एसटी कर्मचाऱ्यांशी टीव्ही9 च्या प्रतिनिधींनी बातचित केली. अनिल परब यांच्या नावाने गाजर मोडत येथील कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांना पदावरून हटवण्याची मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. आमच्यावर कोणतीही कार्यवाही झाली तरी विलिनीकरणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय एकही कर्मचारी आगाराच्या बाहेर गाडी काढणार नाही. आतापर्यंत 42 आत्महत्या झाल्या आहेत, त्या वाढतच जातील, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांची सकाळपर्यंत वाट पाहून कठोर निर्णय, परिवहन मंत्री परबांचा इशारा; तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन

Nashik Gold| योगायोगाचे घबाड, सोने दीड अन् चांदी 4 हजारांनी स्वस्त, वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत गोड झाला!