
Ganeshotsav Toll Waiver : महाराष्ट्रात दरवर्षी गणोशोत्सवाच्या काळात धूम असते. मुंबई, पुण्यात कामासाठी गेलेले चाकरमानी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात आपापल्या गावी जात असतात. कोकणवासीयांना आपल्या गावी कोणत्याही अडचणीविना जाता यावे म्हणून सरकारकडून जादा बसेस आणि रेल्वे सोडल्या जातात. तर काही कोकणवासी आपापल्या खासगी वाहनांनी गावाकडे प्रयाण करत असतात. खासगी वाहनांतून प्रवास करताना मात्र कोकणवासींयाचे टोलमुळे हजारो रुपये जातात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाआहे. सरकारने गणेशोत्सवाच्या काळात टोलमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर केली आहे. ही सवलत कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना लागू असणार आहे.
या सवलतीसाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठीही हेच पास वैध राहील. या निर्णयामुळे कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात कोकणात मोठ्या संख्येने जात असतात. या टोलमाफीमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि खर्चात बचत होणार आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणातील गणेशभक्तांच्या उत्साहात निश्चितच भर पडणार आहे.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरवर्षी गणेशोत्स्वासाठी जाताना कोकणातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात टोलच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. मात्र आता यंदा टोलमाफीचा निर्णय घेण्यात आल्याने गणेशभक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.