
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. सुनेत्रा पवार या नुकतंच मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी त्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानमंडळ सदस्य उपस्थित राहणार आहे. सुनेत्रा पवारांनी साप्ताहिक बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी ही पहिलीच मोठी बैठक आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे लागले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता त्या पक्षाचा कार्यभारही खांद्यावर घेताना दिसत आहेत. आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीतील राजकारणाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. पक्षांतर्गत शिस्त आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार आहे.
या बैठकीत मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरणावरही चर्चा केली जाणार आहे. मंत्रालयातील या प्रकरणानंतर झिरवळ चांगलेच अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे शनिवार सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल होते, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच आज नरहरी झिरवळ स्वतः सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. या बैठकीत कोअर कमिटीसमोर त्यांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. आता झिरवळ प्रकरणात नेमकी सत्यता काय आहे, याचा अहवाल सुनेत्रा पवार आणि कोअर कमिटीचे सदस्य या बैठकीत समजून घेणार आहेत.
दरम्यान पक्षाच्या अंतर्गत संरचनेतही मोठे फेरबदल होण्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कधी आणि कुठे घ्यायची, याची तारीख आज निश्चित केली जाऊ शकते. येत्या दोन आठवड्यांत ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.