…आणि पुणेकरांना दादांची आठवण झाली; सुनेत्रा पवारांचं अजितदादांच्या पावलावर पाऊल, पहाटे पहाटेच दौरा
बारामतीत वादळी पावसानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पहाटे ६ वाजल्यापासून ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाल्या; अधिकाऱ्यांना कडक सूचना देत प्रत्यक्ष बसमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.

राज्याच्या राजकारणात पहाटेचा दौरा आणि कामाचा धडाका अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख होती. पण अजित दादांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्वच बारामतीकरांना अजितदादांच्या याच स्टाईलची आठवण करुन दिली आहे. सुनेत्रा पवार या आज सकाळीच ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळाल्या. सुनेत्रा पवारांनी पहाटे ६ वाजल्यापासून बारामती शहरात आणि परिसरात पाहणी दौरा करण्यास सुरुवात केली. अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवत सुरू असलेला सुनेत्रा वहिनींच्या या दौऱ्याची सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
वादळी पावसानंतर सुनेत्रा वहिनी थेट रस्त्यावर
बारामती शहर आणि परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या अचानक आलेल्या वादळामुळे शहरातील अनेक भागांत मोठी वृक्ष आणि झाडे उन्मळून पडली होती. अनेक सखल भागांत पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरांचे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी कोणतीही वेळ न घालवता थेट पहाटेच बारामती गाठली. यानंतर सुनेत्रा पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंचं फैलावर घेतलं.
नागरिकांना दैनंदिन जीवनात कोणताही त्रास होऊ नये. वाहतूक कोंडी होऊ नये आणि पडलेली झाडे तातडीने हटवली जावीत यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. युद्धपातळीवर काम करून शहर पूर्वपदावर आणा, अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
अलनॅनोचा धोका अन् शेतकऱ्यांचे नुकसान; सरकार सकारात्मक
या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना सुनेत्रा पवार यांनी शेतकरी आणि नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा दिला. त्या म्हणाल्या, अचानक सुटलेल्या वादळामुळे बारामतीत मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाला तत्परतेने काम करण्याचे आदेश दिले असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यापुढील मदतीची प्रक्रिया सरकार तातडीने करेल. सध्या अलनिनोचा जो काही धोका आहे, त्याची सरकारला पूर्ण कल्पना असून त्यावर सातत्याने विचार सुरू आहे. जेव्हा जेव्हा या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांना न्याय देणाराच असेल, यात शंका नाही, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
यावेळी सुनेत्रा पवारांनी बारामती एस.टी. बस स्थानकालाही भेट दिली. राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानात बारामती बस स्थानकाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही बारामतीकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरल्याने, सुनेत्रा पवार यांनी स्वतः बस स्थानकाला भेट देऊन तेथील अधिकारी, चालक, वाहक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. बस स्थानकाची ही स्वच्छता अशीच टिकून राहावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. केवळ कौतुकाची थाप देऊन सुनेत्रा पवार थांबल्या नाहीत, तर त्यांच्या विशेष प्रयत्नांतून बारामती डेपोसाठी मंजूर करण्यात आलेल्या १० नवीन बसेस त्यांनी बारामतीकरांच्या सेवेत दाखल केल्या.
तसेच प्रवाशांच्या, विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत? एस.टी. प्रवासादरम्यान त्यांना कोणत्या समस्या भेडसावतात? हे प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चक्क एस.टी. बसमध्ये चढून प्रवास केला. त्यांनी प्रवाशांच्या शेजारी बसून त्यांच्याशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
दादांसारखी कडक शिस्त आणि कामाचा वेग
दरम्यान अजितदादांचा दौरा म्हटला की अचूक वेळ, कडक शिस्त आणि जागेवरच अधिकाऱ्यांचे कान उपटणे हे ठरलेले असते. आज सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यातही अगदी तेच चित्र पाहायला मिळाले. पहाटे ६ वाजल्यापासून सुरू झालेला हा दौरा, अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचना आणि थेट जनतेमध्ये मिसळून संवाद साधण्याची त्यांची आक्रमक पण तितकीच आपुलकीची पद्धत पाहून बारामतीकरांना अजितदादांची आठवण झाली.