सुनेत्रा पवारांनी राज्याचं नेतृत्त्व करावं, मुख्यमंत्री म्हणून…बड्या मंत्र्याचं थेट विधान; महायुतीत नेमकं काय घडतंय?
फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची चर्चा रंगताच आता महायुतीच्या घटकपक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. फडणवीस दिल्लीला गेल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याचं नेतृत्त्व करावं अशी जाहीर इच्छा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.

Sunetra Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या वेगळे वारे वाहत आहे. एकीकडे शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असा दावा केला जातोय. पवार गटाच्या नेत्यांनी ही चर्चा फेटाळली आहे. परंतु पडद्यामागे याबाबत चर्चा चालू असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस हे दिल्लीत जाणार असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणही नव्याने बदलेल, असा कयास लावला जात आहे. फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची चर्चा रंगताच आता महायुतीच्या घटकपक्षांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. फडणवीस दिल्लीला गेल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याचं नेतृत्त्व करावं अशी जाहीर इच्छा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.
सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं
दत्तात्रय भरणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी फडणवीस दिल्लीला गेले तर मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नाचे उत्तर दिले. शेवटी प्रत्येक नेत्याला, कार्यकर्त्याला आपल्याच पक्षाचा नेता मोठा व्हावा असे वाटते. तसं वाटणं हे साहजिकच आहे. आमच्या नेत्या या सुनेत्रा पवार आहेत. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, हीच आमची इच्छा आहे. शेवटी इच्छा असणे चुकीचे नाही, असे मत दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले
तसेच आमचे दिंवगत नेते अजितदादा यांना मुख्यमंत्री होण्याची खूप इच्छा होती. परंतु त्यांना होता आलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे लवकरच महाराष्ट्र आणि दिल्लीत मोठे बदल होणार असल्याचे बोलले जात असताना फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. तुम्ही आता दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार का, दिल्लीला जाणार का? असे विचारले असता फडणवीस यांनी या प्रश्नाचे मी कालच दिल्लीला जाऊन आले, असे उत्तर दिले आहे. त्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.