पवारांच्या राष्ट्रवादीचं आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळेंच्या सूचक विधानाने खळबळ, म्हणाल्या…

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस हा पक्ष अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून निघालेले लहान पक्ष, नेते यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्यानुसार मजबूत अशी, अखंड अशी काँग्रेस देशात उभी राहायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

पवारांच्या राष्ट्रवादीचं आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळेंच्या सूचक विधानाने खळबळ, म्हणाल्या...
sharad pawar and supriya sule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2026 | 4:51 PM

NCP Merger In Congress : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा एक विचार समोर मांडला आहे. काँग्रेसचीच विचारधारा असणारे परंतु राज्यांमध्ये वेगळे अस्तित्त्व असलेल्या सर्व स्थानिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे, काँग्रेसला मजबूत करावे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या मोहिमेचे नेतृत्त्व खासदार शरद पवार यांनी करावे, असेही राऊत म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे, असे विधान केले आहे. दरम्यान, आता राऊतांच्या या विचारावरच खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता भविष्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनकरण होणार का? असे विचारले जात आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

संजय राऊत यांनी मांडलेल्या विचारावर सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. यावर सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. संजय राऊत हे माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा आदर आहे. त्यांनी चांगला सल्ला दिला आहे. परंतु आता हे सगळं कधी होईल, कसे होईल ते येणारा काळच सांगेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. म्हणजेच आगामी काळात शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली येऊन काम करू शकतो, असा अंदाज सुळे यांच्या विधानानंतर लावला जात आहे. त्यांनी अगोदर शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला आता तृणमूल काँग्रेस पक्षाला तोडण्यात येत आहे. त्यामुळेच आम्ही तृणमूल काँग्रेससोबत आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

संजय राऊत नेमकंं काय म्हणाले होते?

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. “काँग्रेस हा पक्ष अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून निघालेले लहान पक्ष, नेते यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्यानुसार मजबूत अशी, अखंड अशी काँग्रेस देशात उभी राहायला पाहिजे. शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घ्यायला पाहिजे. एकत्र येण्याची जी भूमिका बनत आहे, त्याचे नेतृत्त्व शरद पवार यांनी केले तर ही मोहीम खूप पुढे जाईल,” असे थेट विधान संजय राऊत यांनी केले.

राऊत राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले?

तसेच, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही त्यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी तसेच इतर पक्ष काही कारणामुळे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. परंतु आज ते पक्ष काँग्रेसोबत काम करत आहेत. सरकारमध्येही ते पक्ष सोबत असतात. हा विचार सगळा एकत्र आला तर नरेंद्र मोदी यांनी लादलेला भ्रष्ट कारभार आहे, त्याला फार मोठे आव्हान उभे करता येईल, असे मत राऊत यांनी म्हटले.

Follow Us