Taliye Landslide : तळीये दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण; नेत्यांकडून मृतांना श्रद्धांजली; मात्र वर्षभरात सरकारकडून साधी एक विटही रचली गेली नाही!

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सरकारमधील शेकडो नेत्यांनी तळीये गावाला भेट दिली. नागरिकांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. तळीये वासियांच्या पुनर्वसनाचं आश्वासन देत पक्की घरं बांधून देऊ असं सांगितलं. आज या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. नेत्यांनी पुन्हा मृतांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, आजही या गावात सरकारकडून साधी एक विटही रचली गेली नाही!

Taliye Landslide : तळीये दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण; नेत्यांकडून मृतांना श्रद्धांजली; मात्र वर्षभरात सरकारकडून साधी एक विटही रचली गेली नाही!
तळीयेवासिय अजुनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत
Image Credit source: TV9
| Updated on: Jul 22, 2022 | 7:07 PM

रायगड : ज्या डोंगराच्या पायथ्याशी जन्म घेतला, वाढले, आयुष्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली, तोच डोंगर काळ म्हणून कोसळेल असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 22 जुलै 2021 रोजी तळीये गावावर डोंगरकडा कोसळला (Landslide) आणि अख्खं गाव चिखलात गाडलं गेलं. दोन दिवस चाललेल्या बचावकार्यात 50 पेक्षा अधिक मृतदेह चिखलाने माखलेल्या किंबहुना कुजलेल्या अवस्थेत काढण्यात आले. शेवटी उरलेल्या सर्वांना मृत घोषित करत बचावकार्य थांबवण्यात आलं. या दुर्घटनेत एकूण 86 जणांचा जणांचा मृत्यू झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह सरकारमधील शेकडो नेत्यांनी तळीये गावाला भेट दिली. नागरिकांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. तळीये वासियांच्या पुनर्वसनाचं (Rehabilitation) आश्वासन देत पक्की घरं बांधून देऊ असं सांगितलं. आज या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालं. नेत्यांनी पुन्हा मृतांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, आजही या गावात सरकारकडून साधी एक विटही रचली गेली नाही!

पुनर्वसनाची फक्त घोषणा आणि आश्वासनं

आज पावसाची एक मोठी सर आली की इथले लोक जीव मुठीत धरुन बसत आहेत. वर्षभरापूर्वी झालेला आघात आजली इथल्या लोकांच्या मनात घर करुन आहे. आजही इथल्या नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. दुर्घटनेनंतर आलेल्या सर्वच नेत्यांनी गावकऱ्यांना आश्वासनं दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गावकऱ्यांचं सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याची घोषणा केली. तळीयेवासियांना म्हाडामार्फत पक्की घरं बांधून दिली जाणार असल्याची घोषणा आव्हाडांनी केली होती. या घरांची रचना आणि ती कशी असणार याचे फोटोही आव्हाडांनी जाहीर केले होते. मात्र, वर्ष लोटलं तरी तळीयेतील लोकांना हक्काचं आणि पक्क घरं काही मिळालेलं नाही.

नव्या सरकारकडून तळीयेवासियांना मोठी आशा

आता सरकार बदललं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त आहेत. त्यातच राज्यातील पूरस्थितीची आढावा घेत उपाययोजना आणि मतदकार्याच्या सूचनाही ते देत आहेत. अशावेळी तळीयेवासियांना आता नव्या सरकारकडून पुनर्वसनाच्या अपेक्षा आहेत. गावातील नागरिक नव्या सरकारकडे आस लावून आहेत. मागील सरकारने दिलेलं पक्क्या घराचं आश्वासन हे सरकार पूर्ण करेल, अशी अपेक्षा तळीयेतील नागरिकांना आहे.

नेत्यांकडून मृतांना श्रद्धांजली

दरम्यान, तळीये दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर माजी राज्यमंत्री आदिती तटकरे आणि शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी तळीये गावात जाऊन 86 मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.